खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ, येळ्ळूर संचलित रवळनाथ हायस्कूल, शिवठाण (ता. खानापूर) येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. पी. ए. पाटील होते. प्रमुख वक्ते म्हणून मणतुर्गा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जे. एम. पाटील उपस्थित होते, तर लोंढा रेंजचे रेंज फॉरेस्ट अधिकारी श्री. पी. जी. नंद्यापगोळ हे प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती होते. त्यांच्या येत्या जून महिन्यातील सेवानिवृत्ती निमित्त शाळेतर्फे शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शन करताना श्री. जे. एम. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, कोणताही ताण-तणाव न घेता धैर्याने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, असा मोलाचा सल्ला दिला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. पी. ए. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करून शाळेचे व पालकांचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर बीट फॉरेस्ट गार्ड महादेव आप्पा, वामन शंकर मिराशी, संभाजी सटवाप्पा मिराशी, रामा नारायण इसराणी, सौ. राजश्री अभिमन्यू मिराशी, सौ. राधिका मिराशी, रामा का. लक्ष्मण पवार, सौ. सविता गुरव, तसेच शाळेचे एस.डी.सी. श्री गावडा उपस्थित होते. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. एन. व्ही. नाईक व गणित शिक्षक श्री. एम. एस. कदम हेही व्यासपीठावर होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पमाला अर्पण करून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री. टी. वाय. आळवणी यांनी केले. सूत्रसंचालन श्री. व्ही. बी. पाटील, मार्गदर्शन सौ. सविता काजूनेकर मॅडम, तर आभार प्रदर्शन श्री. बी. व्ही. पाटील यांनी केले.
यावेळी क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देण्यात आले. तसेच आदर्श विद्यार्थिनी म्हणून कु. रेणुका पवार (इयत्ता दहावी) व आदर्श विद्यार्थी म्हणून कु. पार्थ इसराणी (इयत्ता दहावी) यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ गीताने झाली.
Belgaum Varta Belgaum Varta