बेळगाव : बेळगाव येथील सागर शिक्षण महाविद्यालयामध्ये 8 मार्च रोजी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य राजू हळब हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. नाझीया कोतवाल व डॉ. अनिता रवींद्र या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या प्रार्थना गीताने झाली. तर प्रास्ताविक व स्वागत डॉ. टी. एम. नौकुडकर यांनी केले.
यावेळी बोलताना डॉक्टर नाझिया कोतवाल म्हणाल्या, महिलाना समाजात आज ही समानतेची वागणूक मिळत नाही, ती मिळाली पाहिजेत. त्याचबरोबर समाजातून लिंगभेद सुद्धा नाहीसा झाला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात आज महिला भरारी घेत आहेत, महिलांना पुरुषाकडून सन्मान मिळाला पाहिजे, प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पूर्वीच्या अंधश्रद्धा, परंपरा बाजूला ठेवून महिलांनी आता आधुनिकतेची कास धरून, विज्ञान युगात जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चूल आणि मूल ही संकल्पना आता बाजूला गेली, असून प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला सुद्धा आता कार्य करीत आहेत, तेव्हा आता महिला अबला राहिली नसून ती सबला झाली आहे. महिलेकडे सहनशीलताही खूप आहे. पण प्रसंगी ती रौद्ररूप सुद्धा धारण करू शकते. असे विचार त्यांनी व्यक्त केले. यावेळी प्रा. एम. एन. नरसन्नावर, प्राचार्य राजू हळब, डॉ. अनिता रवींद्र, त्याचबरोबर विद्यार्थिनी श्रुतिका पाटील, निकिता बिर्जे, ओमकार गाऊन्स, माधुरी पाटील, रसिका पाटील यांनीही महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले. महिला दिनाचे औचित्य साधून सागर शिक्षण महाविद्यालयामध्ये स्वरचित कविता लेखन व अन्नोत्सव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कॉलेजच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला होता. स्पर्धा परीक्षक म्हणून प्रा. सी. एम. गोरल व डॉ. नाझिया कोतवाल यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी चैताली सायनाक व अश्विनी गावडे यांनी केले. तर आभार प्रा. एन. आय. सनदी यांनी मानले.