लोकांची तारांबळ : आठवडी बाजारात शेतकऱ्यांचे नुकसान
कोगनोळी : परिसरात वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार वारा, विजेचा कडकडाट, जोरदार पाऊस गारांचा मारा यामुळे या विभागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
सुमारे दोन तास झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने हुलकावणी दिली होती. शुक्रवार तारीख 8 रोजी दिवसभर कडक ऊन जाणवत होते.
दुपारी चारच्या सुमारास अचानक ढग जमून येऊन विजेच्या कडकडाटासह, जोरदार वाऱ्यात वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. कोगनोळी येथील शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने आसपासच्या खेड्यातील शेकडो शेतकरी आपल्या शेतातील पालेभाज्या घेऊन बाजारासाठी आले होते. पण सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले. दमदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते तर गटारी तुडुंब भरून वाहू लागल्या होत्या. येथील मुख्य बाजारपेठेत या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने अनेक व्यापाऱ्यांचे फळभाज्या या पावसात वाहून जाऊ लागल्या होत्या.