बेळगाव : आमदारकीची निवडणूक जशी जवळ येईल तसं बेळगावचे राजकीय वातावरण तापत चालले आहे. हौसे, नवसे, गवसे सगळे झटून कामाला लागले आहेत. राजकीय पक्षांबरोबरच समितीत सुद्धा वादळ घोंगावू लागले आहे. काही जणांना आमदारकीची स्वप्न पडत आहेत. तर काहींना आमदार झाल्यासारखे वाटते, काही जण घोड्यावर बसले आहेत तर काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. काहीजण तर स्वतःला बलभीम समजत आहेत. डरकाळ्या फोडत आहेत. त्यांचे हातावर मोजता येतील एवढे पाठीराखे तर गंगाधरच “शक्तिमान” आहे असे भासवत आहेत. त्याचा पोलखोल करणारा हा लेखाजोखा.
बेळगावात मागील वर्षातली एक निवडणूक काहीजणांना ह्या आजाराला कारणीभूत झाली आहे. त्यांना आम्हीच बेळगावचे भाग्यविधाते असं वाटू लागलं आहे. त्यांचे “प्यादे” मन लावून सोशल मीडियावर काम करत आहेत. एकत्रीकरणासाठी म्हणून पाईक बनलेले हे, शंभर शकले होवून विविध ठिकाणी विखुरले आहेत. आपल्यातून गेलेला “बाटका” आणि आपण मात्र “पाईक” हे त्यांचे दुटप्पी धोरण आता लोकांच्या लक्षात येत आहे. ज्येष्ठांचे योगदान मान्य न करता, कुणी अस्मितेसाठी खस्ता खाल्ल्यात याचं त्यांना काहीही भान नाही. कुणाचे योगदान किती, कोण मराठीसाठी काय केलं याचं कोणतंही परीक्षण त्यांच्याकडे नाही. काही लोकं दुसऱ्याच्या परिश्रमावर मिळालेल्या यशानं हुरळून जाऊन “मीच म्हणजे राजा, मीच गावचा किंग” अशा पद्धतीच्या वल्गना करू लागले आहेत.
देखल्या देवा दंडवत आणि पाठीमागे त्याची निंदा. असा प्रपंच बेळगावमधील काही व्यक्तींच्याकडून चालू आहे. अर्ध्या
हळकुंटाने पिवळे झालेले आणि स्वतःला कथाकथित नेते मानणारे भरपूर झालेत. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता समितीच्या ज्येष्ठ नेत्यांवर माघारी विचित्र टीका करत आहेत. ज्या-ज्यावेळी ज्येष्ठांची नावं समोर येतात त्या-त्यावेळी त्यांच्यावर मन भरून ते टीका करायला चालू करतात. अनेकांना त्यांनी वेगवेगळी उपहासात्मक नावे ठेवलेली आहेत. ज्यांनी त्यांना मदत केली त्यांच्यावरच व्यक्तिशः अश्लान्घ पद्धतीच्या टीका करू लागले आहेत. यात ज्येष्ठ नेतेही सुटले नाहीत. कोणाला नसीरुद्दीन शहा, कोणाला तांबडी पाल, कोणाला ओंमपुरी, कोणाला हॅटट्रिकवीर, तर कुणाला पांड्या मास्तर, पाकीट पत्रकार, पोपट पत्रकार, गोटी, घुबड तोंड, आवळा, कोल्हा, कुत्रे, पांढरा गांधी, लांडगा अशा पद्धतीची त्यांनी नावे ठेवली आहेत. प्रसंगी त्यांनाच साष्टांग दंडवत घालून नुकताच काही पदेही आपल्या झोळीत पाडून घेतली आहेत. तोंडावर एक पाठीमागे दुसरं असल्या वागण्यामुळे त्यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून गेले आहेत.