नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आता नोव्हेंबर महिन्यात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (30 ऑगस्ट) बेळगाव सीमाप्रश्नी सुनावणी झाली. त्यावेळी कर्नाटकच्या वकिलांनी वेळ मागितल्याने पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. न्यायमूर्ती जोसेफ यांच्या त्री सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. महाराष्ट्र सरकारच्या वतीने न्यायालयात वकील राकेश द्विवेदी आणि शिवाजीराव जाधव न्यायालयात उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयीन कामकाज पाहणाऱ्या वकिलांशी दूरध्वनीवर बातचीत केली. महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे सर्वोच्च न्यायालयात मांडा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी वकिलांना केली.
खरंतर बेळगाव सीमाप्रश्नावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तब्बल पाच वर्षांनी झालेल्या या सुनावणीकडे समस्त सीमाभागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागलं होतं. आजच्या सुनावणीत महत्त्वाच्या बाबी समोर येतील अशी अपेक्षा होती. परंतु कर्नाटक सरकारच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितल्याने आता ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी दोन महिन्यांनी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये पार पडणार आहे.