बेळगाव : बेळगाव तालुक्यात रिंगरोडसाठी शेतकर्यांच्या जमिनी संपादन करण्यासाठी वृत्तपत्रात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. हा रिंगरोड तालुक्यातील शेतकर्यांना अधोगतीला नेणारा आहे. येथील शेतकर्यांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे. शेतीवरच येथील शेतकर्यांचा उदरनिर्वाह चालत आहे. शेतीचा जोडधंदा दुग्धव्यवसायही अवलंबून आहे. यासाठी शेतकर्यांनी हा रिंगरोड प्रकल्प उधळून लावणे गरजेचे आहे. तेव्हा तालुक्यातील शेतकर्यांनी पुन्हा एकदा लढा उभारून हा शेतकरी विरोधी रिंगरोड प्रकल्प उधळणे गरजेचे आहे, असे उद्गार माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले.
कॉलेज रोडवरील तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात शनिवार दि. 15 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते.
आर. के. पाटील यांनी प्रास्तावित केले.
अॅड. शाम पाटील म्हणाले की, मागे सदर रिंगरोड प्रकल्प कोर्टात याचिका दाखल करून रद्द करण्यात आला होता. पुन्हा सरकारने हा प्रकल्प उभारला आहे तेव्हा आम्ही सर्वजण या शेतकरी विरोधी सुपीक जमिनीवर होणार्या प्रकल्पाला पुन्हा तालुक्यातून हद्दपार करू.
यावेळी समितीचे चिटणीस अॅड. एम. जी. पाटील, अॅड. शाम पाटील, अॅड. सुधीर चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी मध्यवर्ती खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, संतोष मंडलिक, विलास घाडी, आर. आय. पाटील, मनोहर संताजी, रावजी पाटील, आर. एम. चौगुले, सुभाष मरुचे, बिडी मोहनगेकर, गुंडू गुंजीकर, परशराम शहापूरकर, मारुती शिंदे, महादेव कंग्राळकर, शिवाजी कुट्रे, आनंद तुडयेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.