निपाणी (वार्ता) : सन २०२३-२४ या वर्षात निपाणी तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने सर्व शेतकऱ्यांना पीक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाईचा दावा करण्यासाठी शेतकऱ्यांनी एफआयडी नोंदणी आवश्यक आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सर्व जमिनीचे सर्व्हे क्र. एफआयडी क्रमांकाशी लिंक करून घ्यावेत, असे आवाहन तहसिलदार मुजफ्फर बळीगार यांनी पत्रकान्वये केले आहे.
पत्रकातील माहिती अशी, सर्व शेतकऱ्यांनी जवळच्या ग्रामवन केंद्र किंवा रयत केंद्रांना भेट देऊन हे काम करावे. जर एफआयडी नोंदणी आधीपासूनच असेल तर त्या क्रमांकाशी संबंधित सर्व जमिनींचे सर्वे क्रमांक जोडले आहेत की नाही ते तपासून घ्यावे. संयुक्त खातेदार असल्यास, प्रत्येक संयुक्त खातेदाराने स्वतंत्र एफआयडी नोंदणी करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास शेतकऱ्यांकडे येणारे सरकारी योजनेचे पैसे खात्यात जमा होणार नाहीत. त्याशिवाय इतर शासकीय मदत योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाहीत. यासाठी शेतकरी जबाबदार असतील. यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, दूरध्वनी क्रमांक, शेतीचे उतारे आदी कागदपत्रे संबंधित केंद्रावर सादर करणे आवश्यक आहे असल्याचे म्हटले आहे.