प्रा. राजन चिकोडे यांचे निवेदन; अधिवेशनात ठरावाची मागणी
निपाणी (वार्ता) : भारतीय राजघटना अनुरूप २६ जून १९५६ रोजी भारत सरकारने हिंदू खाटीक जातीला अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याचा अध्यादेश काढला. त्यानुसार देशातील १५ राज्यानी हिंदू खाटीक जातीला अनुसूचित जातीचा दर्जा देऊन त्यांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात प्रगती करण्याची संधी दिली.
बेळगाव येथील मंत्री मंडळाच्या अधिवेशनात हा ठराव मंजूर करावा. त्यामुळे पिढ्यानपिढ्या मागासलेल्या खाटीक समाजाला न्याय मिळेल, अशा मागणीचे पत्रक सीमाभाग खाटीक महासंघाचे वतीने निपाणी नगर सभेचे माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
निवेदनातील माहिती अशी, कर्नाटक राज्यातील हिंदू खाटीक समाज सर्वत्र विखुरलेला आहे. अज्ञान, आर्थिक दुर्बल स्थिती, शिक्षणाचा अभाव, यामुळे हा समाज सर्व क्षेत्रात मागासलेला व अशिक्षीत आहे. या समाजात अद्याप शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. परिणामी पिढ्यानपिढ्या चालत आलेला मांस विक्री व्यवसायात नवी पिढी उपजीविका करीत आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच डॉक्टर, इंजिनिअर व उच्चपदस्थ अधिकारी आहेत. या समाजातील अज्ञानामुळे कर्नाटक राज्यातील वेगवेगळ्या भागातील खाटीक समाजातील बांधवानी आपल्या जातीचा उल्लेख तेथील बोली भाषेनुसार खाटीक ऐवजी खटीक, खाटकी अशा प्रकारे शाळेत प्रवेश घेतेवेळी नोंदविला असला तरी पिढीजात मांस विक्री करणारे असतील तर ते खाटीकच आहेत. खाटीक जातीच्या युवकांना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात प्रगतीचीद्वारे खुली करण्यासाठी कर्नाटक राज्यातील खाटीक जातीचा अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याचा ठराव एकमताने मंत्री मंडळाच्या बैठकीत करण्याचा निर्णय कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री एच. एम. रेवण्णा यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या खाटीक समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. हा ऐतिहासिक निर्णय घ्यावा.
खाटीक हा वैदिक काळात यज्ञविधीत पशुबळी, मध्ययुगात मुस्लिम सत्ताशी संघर्ष करणारे ब्रिटिश सत्तेत १८५७ च्या मिरठ येथील पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात नेतृत्व करणारा किंवा १९०६ मध्ये नाशिक त्रंबकेश्वर मंदिर प्रवेशासाठी समतेसाठी सत्याग्रह करणारा हा खाटीक समाज आजही अपेक्षित आहे हे दुर्दैव आहे. समाजात मांस विक्री व्यवसाय हलक्या प्रतीचा व्यवसाय समजला जातो. आजकालच्या मुली मटण व्यवसाय करणारे मुलास वर म्हणून पसंत करीत नाही. समाजातील परिणामी अनेक मुला मुलींचे विवाह रखडलेले आहेत. जर युवक वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी व्यवसाय करू लागला तर साहजिकच त्याच्या जीवनामध्ये स्थैर्य येईल.शिवाय स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल. स्वातंत्र्यपूर्व काळात विविध क्षेत्रात काम करत असलेला हा समाज आज आधुनिक युगाबरोबर धावण्याची संधी मिळावी, या साठी हिंदु खाटीक जातीला अनुसूचित जातीचा दर्जा देण्यासंबंधी ठराव करावा. खाटीक समाजाच्या युवकांना शिक्षण,उद्योग क्षेत्रात वावर करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असेही प्रा. राजन चिकोडे यांनी नमूद केले आहे.