कडोली : येथील मराठी साहित्य संघाच्या बैठकीत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कोल्हापूरचे साहित्यिक कृष्णात खोत यांचे अभिनंदन करण्यात आले.
कृष्णात खोत यांनी 2014 साली झालेल्या 29 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. बैठकीत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी अनेकांनी त्यांच्या संमेलनातील आठवणींना उजाळा दिला. श्री. खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याने कडोलीकरांना अभिमान आणि आनंद वाटल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
यापूर्वी कडोली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याची आठवण करून देण्यात आली. तसेच कडोली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले कांही साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले याचाही अभिमान असल्याची भावना काहींनी व्यक्त केली. अशा साहित्यिकांचा गौरव हा कडोलीकरांचाही गौरव आहे असाही उल्लेख झाला.
बैठकीत रविवार ता. 7 जानेवारी 2024 रोजी होणारे 39 वे कडोली मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कामांची विभागणी करून त्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली. बैठकीला संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.