संजीवीनी फौंडेशनची मनोरुग्णांसाठी आयोजित “नयी दिशा” कार्यशाळा संपन्न
बेळगाव : मनोरुग्णांची मानसिकता ओळखून त्यांच्या घरच्यांनी योग्य ते उपचार चालू ठेवल्यास रुग्ण बरा होऊ शकतो, कुणीतरी काळी जादू केली आहे म्हणून अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले असल्याचे मत राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. देविका गस्ती यांनी मांडले.
संजीवीनी फौंडेशनच्या वतीने मनोरुग्णांसाठी आयोजित “नयी दिशा” या एक दिवसीय कार्यशाळेच्या उदघाटन समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा रुग्णालयाचे मनोरुग्ण विभाग प्रमुख डॉ. टी. आर. चंद्रशेखर, डॉ. देविता गस्ती, संस्थेचे सीईओ मदन बामणे आणि संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ उपस्थित होत्या.
सुरुवातीला मदन बामणे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करताना उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यशाळा आयोजित करण्यामागचा उद्देश सांगितला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेच्या सल्लागार सदस्या डॉ. सुरेखा पोटे यांनी करून दिल्यानंतर मदन बामणे आणि सविता देगीनाळ यांनी शाल स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान केला.
यावेळी बोलताना डॉ. चंद्रशेखर म्हणाले की, जुन्या काळात मानसिक रुग्णाला भूतबाधा झाले म्हणून अनेक ठिकाणी मंत्रतंत्र करणे, झाडाला बांधून ठेवणे, रात्रभर डोक्यावर दिवा ठेवणे अशाप्रकारचे अघोरी प्रकार करत असत, असे करत असताना तामिळनाडूमध्ये पंचवीसहुन अधिक लोक भाजून मृत्युमुखी पडल्याची घटना घडल्यानंतर सरकारने मेंटल हेल्थ केअर कायदा तयार केला. तेव्हापासून रुग्णांची हेळसांड थांबली जरी असली तरी त्यांचे नातेवाईक परिस्थितीचा स्वीकार करताना दिसत नसल्याची खंत डॉ. चंद्रशेखर टी. आर. यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी समारोप करत असताना संजीवीनी मनोरुग्ण पुनर्वसन केंद्र सुरू करण्यामागचा उद्देश सांगितला.
फक्त औषधोपचारच करून रुग्ण बरे होत नसतात तर त्यासोबत त्यांचे पुनवर्सन होणे गरजेचे असते. आमच्याकडे त्यांना व्यस्त कसे ठेवलं पाहिजे यासोबतच रोजचा दिनक्रम कसा असावा याबद्दल त्यांना तयार केलं जातं, व्यावसायिक थेरेपी शिकवल्या जातात.
आजचा उद्देश हाच होता की बेळगाव आणि परिसरातील अशा व्यक्तींना या कार्यशाळेचा लाभ व्हावा आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात जगण्याची एक नयी दिशा मिळावी, असेही त्या म्हणाल्या.
दिवसभर मनोरुग्णांसाठी व्यावसायिक थेरपीच्या माध्यमातून कँडल होल्डर आणि फोटो फ्रेम करवून घेतल्या गेल्या.
दुपारच्या सत्रात आहारतज्ञ प्रियांका राठोड यांनी निरोगी आरोग्यासाठी कोणत्या पध्दतीचा आहार घ्यावा तो कधी घ्यावा किती प्रमाणात घ्यावा याविषयी माहिती दिली. वेळेत झोपून वेळेत उठणे किमान तीन ते साडेतीन लिटर पाणी पिणे, गोड पदार्थ शक्यतो टाळणे असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर विविध प्रकारचे खेळ खेळण्यात आले तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी नृत्य सादर केले.
मनोरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी मार्गदर्शन, विविध थेरेपी, मनोरंजन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले.
एकूणच दिवसभरात या कार्यशाळेत सहभागी साऱ्यांच्या मनाला एक वेगळाच उत्साह देऊन गेला. संपूर्ण कार्यशाळेच्या नियोजनासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या युवक युवतींच्या नई उमंग या संस्थेने विशेष मेहनत घेतली, त्या संपूर्ण टीमला स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ. अनिल पोटे, डॉ. शांता चंद्रशेखर, बांधकाम व्यावसायिक व सिव्हिल इंजिनिअर आर. एम. चौगुले,.संस्थेच्या संचालिका रेखा बामणे, सल्लागार सदस्या प्रीती चौगुले, विद्या सरनोबत, सरिता सिद्दी, लक्ष्मी झेंडे, पुष्पा भेंडवाड, राणी चन्नमा विद्यापीठाच्या एमएसडब्ल्यू विभागाचे विद्यार्थी व इतर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी नेवगिरी तर आभार पद्मा औशेकर यांनी मानले.