सांगली : सांगली प्रशासनाने राज्य सरकारचा अलमट्टी धरणाशी पाणी सोडण्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही, शिवाय कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी प्रमाणात करण्यात येत आहे, असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्य सरकारने तातडीने अलमट्टी धरणातून पाणी साठा कमी करण्याबाबत कर्नाटक सरकारवर दबाव आणला नाही, तर यंदा देखील सांगलीला महापुराचा फटका बसेल, अशी भीती कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे. 26 जुलैपर्यंत याबाबत सरकारने योग्य ती पावले न उचलल्यास एक ऑगस्ट रोजी कृष्णा नदीच्या पात्रात जलपुडी आंदोलन करू असा इशारा कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीकडून देण्यात आला आहे.
गेल्या चोवीस तासात 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणाच्या एकूण चार दरवाज्यातून 8886 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
मुसळधार पाऊस आणि धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग यामुळे वारणा नदी पात्राबाहेर गेली असून अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत. आरळा शितुर पूल पाण्याखाली गेला असून शिराळा व शाहूवाडी तालुक्याचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे त्यामुळे धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.