निपाणी (वार्ता) : दमदार पडलेल्या पावसामुळे येथील शहरासह उपनाराला पाणीपुरवठा करणारा जवाहरलाल तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. दोन दिवसात तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी हा तलाव भरूनही शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे तलावातील गाळ काढला असता तर मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न मिटला असता. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने एका उन्हाळ्यातही पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची भीती असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडीड्डवर यांनी पत्रकान्वये व्यक्त केली आहे.
पत्रकातील माहिती अशी,आजपर्यंत निपाणीतील नागरिकांना नियोजन अभावी पाणी पाणी करावे लागले होते. प्रत्यक्षात वणवण थांबली आहे. गेली पंधरा दिवस पाऊस पडत आहे. शिरगुप्पी ओढ्यातून चांगल्या प्रमाणात पाणी येत असल्याने तलाव भरला. पण याच पाण्यावर एक वर्ष अवलंबून रहावे लागणार आहे.
पाणीसाठा वाढण्यासाठी तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू झाले होते. पण काही दिवसातच ते बंद पडले. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईची समस्या गंभीर बनणार आहे. गाळ काढला असता तर जवाहर तलावातील पाणी साठा वाढून जास्त दिवस पाणी नागरिकांना पुरले असते. याबाबत नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे. याबाबत नागरिकांनी पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. याशिवाय त्यांच्याकडून निधी घेऊन पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्याची मागणी पंकज गाडीवड्डर यांनी केली आहे.