बेळगाव : मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी शाळा सुरू आहेत. पावसाळ्यात भरून वाहणाऱ्या नदीतून चक्क टायर ट्यूबवरून मुले शाळेत जात असल्याचे पहावयास मिळत आहे.
कित्तूर तालुक्यातील निंगापुर गावातील तलाव पावसाच्या पाण्यामुळे भरला असून संपूर्ण गाव पाण्याने व्यापले आहे. त्यामुळे गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गावकऱ्यांना बाहेर जायचे असल्यास नदीतून पोहत जावे लागते किंवा टायर ट्यूबवर बसून नदी पार करावी लागते, अशी परिस्थिती आहे. आता शाळकरी मुलांना रोज याच पध्दतीने समस्येला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी रोज शाळेत जातात तेव्हा पालक नदीच्या एका काठावर उभे राहतात आणि टायर ट्यूबला बांधलेली दोरी ओढतात. विद्यार्थी टायर ट्यूबवर बसून नदी ओलांडून तीरावर पोहोचतात. मुलांचा जीव धोक्यात घालून शाळेत जाण्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
गेल्या 20 वर्षांपासून पावसाळ्यात या गावात हीच परिस्थिती आहे. गावकरी आणि शाळकरी मुलांचा त्रास अवर्णनीय आहे. मात्र, अधिकारी व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नसल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.