Wednesday , December 10 2025
Breaking News

भाजपशी युतीवर धजद प्रदेशाध्यक्षानीच व्यक्त केली नाराजी

Spread the love

 

आपल्याशी चर्चा केली नसल्याची खंत; १६ ला घेणार अंतिम निर्णय

बंगळूर : एच. डी. कुमारस्वामी हे माझ्यासाठी लहान भावासारखे आहेत. मात्र, त्यांनी अमित शहा यांची घेतलेली भेट क्लेशजनक असल्याचे धजदचे प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी शनिवारी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की युतीच्या मुद्द्यावर धजदचे नेते भाजपकडे गेले हे योग्य नाही. तेच आमच्याकडे यायला हवे होते. युती झाल्यापासून मी कुमारस्वामी यांच्याशी बोललो नाही. कुमारस्वामी हे माझ्यासाठी भावासारखे आहेत. देवेगौडा आमच्या वडिलांसमान आहेत. दिल्लीला जात असल्याचे ते मला एका शब्दानेही बोलले नाहीत. काय चर्चा झाली ते त्यांनी सांगितले नाही. भाजपशी युती झाल्याचे प्रदेश पक्षाध्यक्षांनाच सांगितले नसल्याचे ते म्हणाले.
निवडणुकीत २० टक्के मुस्लिम मते मिळाली. वक्कलिग मते काँग्रेसकडे गेली. याला पक्षीय निर्णय म्हणायचे तर पक्षीय पातळीवर चर्चा व्हायला हवी. पक्षीय पातळीवर चर्चा होऊन त्यावर मी सही करायला हवी. कोअर कमिटीची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या विषयावर आपल्याशी चर्चा केली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
धजद पक्षात कायम राहण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मी १६ ऑक्टोबरला माझा निर्णय जाहीर करेन. मी जनता दलात येण्याचे कारण देवेगौडा होते. धर्मनिरपेक्ष विचारसरणी म्हणून मी धजदमध्ये गेलो. त्या दिवशी मी विधानपरिषदेचे सदस्यपद सोडले. मी धजदचा प्रदेशाध्यक्ष आहे. १६ तारखेच्या बैठकीचा अजेंडा म्हणजे, युतीची चर्चा योग्य आहे का? युती अशीच सुरू राहिली तर पुढचे पाऊल काय? देवेगौडा यांचे मन वळवण्याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. देवेगौडा सहमत नसतील तर पुढच्या टप्प्यावर चर्चा करू, असे ते म्हणाले.
त्यांनी तिप्पेस्वामी यांच्यामार्फत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. माझी प्रकृती ठीक नाही. मी १६ तारखेला बोलेन, असे सांगितले आहे, असे ते म्हणाले.
धजदला युतीचा फायदा होत असल्याच्या प्रश्नावर, ३-४ जागा मिळतील किंवा नाही, पण आमच्या सिद्धांताचे काय? भाजप आमचा सिद्धांत मान्य करेल का? १६ ला यावर चर्चा करू. दिल्लीला जाताना त्यांनी मला वगळल्याचे मला दुःख आहे, भाजपच्या जवळ जाणे त्यांच्यासाठी चुकीचे आहे. ते आमच्याकडे यायला हवे होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांना परिस्थितीपुढे मान झुकवावी लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
आम्ही कोणावर अवलंबून नव्हतो, ते आमच्यावर अवलंबून होते. आम्ही त्यांच्याकडे जाऊन बोलणं चुकलं. देवेगौडा यांचा म्हातारपणात हात धरल्याचे समाधान आहे. माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही, आदर महत्त्वाचा आहे. ६० वर्षांच्या राजकारणात माझ्यावर कलंक नाही. १६ तारखेला पुढे काय करायचे याचा ठोस निर्णय घेईन. पवार, नितीश, आप की काँग्रेस पक्ष हे मी ठरवेन. काँग्रेस, भाजपला पर्याय म्हणून कर्नाटकात तिसरी शक्ती असली पाहिजे, असे ते म्हणाले.
आता पक्षाध्यक्ष म्हणून माझी भूमिका मांडण्यात काही अर्थ नाही. आज आपण पांडवांच्या स्थितीत आहोत. लग्नाला जाणं वेगळं, लग्न करणं वेगळं. पक्ष वेगळा, सभागृहाचा आचार वेगळा. भाजपला आमचा सिद्धांत मान्य आहे का? जनता दल जागा बघून राजकारण करणारा पक्ष नाही. कुमारस्वामी यांनी तिप्पेस्वामी यांच्यामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. उद्याच्या बैठकीला बोलावले आहे, पण जाणार नाही, असे ते म्हणाले.
दिल्लीला जाताना न सांगता गेले हे पाहून मनाला दुख झाले. आता मी कार्यकर्त्यांसमोर नतमस्तक झालो आहे. मला बाजूला सारले जात आहे असे मला वाटत नाही. आम्ही त्यांच्या शेतात खत घालत आहोत. त्यांना माझ्याकडे दुर्लक्ष करण्याची काय गरज आहे? देवेगौडा यांच्या दारात भाजपने यायला हवे होते. देवेगौडा यांच्यावर अल्पसंख्याकांचा विश्वास असल्याने मते आली. ते म्हणाले की, वक्कलिग ही जनता दलाची मूळ मते काँग्रेसकडे गेली आहेत.
त्याचवेळी भाजप आणि धजद यांच्या युतीनंतर मुस्लिम नेत्यांनी जेडीएस सोडल्याच्या विकासावर भाष्य करताना ते म्हणाले की, एकाही मुस्लिम नेत्याने पक्ष सोडला नाही. त्यांनी पक्ष सोडला असता तर राजीनामा माझ्याकडे पाठवायला हवा होता ना? असा त्यांनी प्रश्न केला.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *