
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर औत्सुक्य
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या (ता. १६) राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात कोणते नवीन कार्यक्रम असतील, विकासकामांसाठी किती अनुदान दिले जाणार आहे. हमी योजना सुरू ठेवण्यासाठी संसाधनांची कशी जमवाजमव केली जाईल, हे पाहणे मनोरंजक आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या काँग्रेस सरकारच्या दुसऱ्या सत्राचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून काँग्रेसला जास्तीत जास्त जागा जिंकून देण्याच्या तयारीत असलेली सत्ताधारी काँग्रेस जनतेला आकर्षित करण्यासाठी अनेक युक्त्या करत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा उद्या (ता. १६) सादर होणारा १५ वा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे.
सिद्धरामय्या उद्या सकाळी सव्वादहा वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पाचे सरकारी माध्यमांवर थेट प्रक्षेपण केले जाईल. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सिद्धरामय्या मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेणार आहेत. सिद्धरामय्या यांचे हे १५ वे अर्थसंकल्प सादरीकरण असेल आणि कर्नाटकसाठी हा एक नवीन विक्रम आहे.
यावेळी राज्याचा अर्थसंकल्प ३.८० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. आतापर्यंतचा राज्याचा अर्थसंकल्प ३.२७ लाख कोटी रुपयांचा आहे. मात्र यावेळी ५० हजार कोटींची वाढ होणार आहे. यासोबतच यावेळी बजेटचा आकार ३.८० लाख कोटी रुपयांवर पोहोचणार आहे.
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या पाच हमी प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमोर या अर्थसंकल्पातही या हमी प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे, तसेच यासाठी निधी जमवण्याचे आव्हान आहे.
गेल्या वर्षी हमी योजनांमधून विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला नसल्याची ओरड होत असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यंदाच्या अर्थसंकल्पात विकासकामांसाठी निधी देऊन टीकाकारांची मुस्कटदाबी करतील, अशी अपेक्षा आहे.
केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानात भेदभाव, कराचा वाटा कमी होणे, राज्याच्या करवसुलीमध्ये निर्धारित उद्दिष्ट पूर्ण न होणे, संसाधनांच्या जमवाजमवीसाठी काय प्रयत्न केले आहेत, हे उद्याच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट होणार आहे.
दुष्काळ व्यवस्थापनासाठी केंद्राकडून निधीची कमतरता लक्षात घेता येत्या पावसाळ्यापर्यंत दुष्काळी परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी अर्थसंकल्पात किती निधीची तरतूद केली जाणार आहे, हे उद्याच्या अर्थसंकल्पात कळणार असून दुष्काळी मदतीची घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा आहे.
कर्जमाफीची अपेक्षा
दुष्काळामुळे होरपळणाऱ्या राज्यातील शेतकरी वर्गाला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा करणार का, याची उत्सुकता आहे.
सिद्धरामय्या यांनी यापूर्वी मुख्यमंत्री असताना कृषी कर्ज माफ केले होते. त्याचीच पुनरावृत्ती उद्याच्या अर्थसंकल्पात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून आर्थिक सुधारणा राखणारा संतुलित अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांनी सादर करणे अत्यावश्यक आहे. महसूल वसुलीचे उद्दिष्ट वाढवण्याबरोबरच कृषी, शिक्षण, आरोग्य, सिंचन या प्राधान्य क्षेत्रांना किती निधी दिला जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. उद्याच्या अर्थसंकल्पाबाबत अनेक अपेक्षा आणि उत्सुकता असतानाच मुख्यमंत्री हे बजेट लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सर्वसामान्यांवर बोजा पडणार नाही, अशा पद्धतीने सर्व लोकांना आकर्षित करणारा अर्थसंकल्प सादर करतील, अशीच सर्वांची भावना आहे.
मंत्रिमंडळाची विशेष बैठक
लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्प मांडला जात असल्याने त्यात महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सिद्धरामय्या राज्याच्या अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा करतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सिद्धरामय्या मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta