बेळगाव : सीमाभागात अनेक जुनेजाणते जाणकार नेते अभ्यासक, विचारवंत असताना एका तथाकथित “उथळ” व्यक्तीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर “सीमाभागात अडकलेल्या मराठी समाजाला भारत सरकार अजून किती दिवस कुजवणार” या विषयावर परिसंवाद साधण्यासाठी बेळगावातून “अभ्यासक” म्हणून आमंत्रित करण्याचा बालिशपणा करून आयोजकांनी या परिसंवादाचे गंभीर्यच घालविले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ज्यांना सीमालढ्याचा अत्यल्प अभ्यास (तोही सांगोपसांगी कानावर आलेला), गाठीशी तोटका अनुभव अश्या कार्यकर्त्याला सीमालढ्यासारख्या गंभीर विषयावर परिसंवाद करण्यासाठी संमेलनाच्या आयोजकांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांशी सल्लामसलत केली होती का? असा प्रश्न सीमाभागातील जाणकाराना पडला आहे.
या संमेलनात परिसंवादादरम्यान एखादा गंभीर प्रश्न विचारला गेला किंवा एखादा प्रश्न विरोधात्मकरित्या विचारला गेला आणि त्या प्रश्नाचे समर्पक उत्तर बेळगावातील प्रवक्त्याला देता आले नाही किंवा आपला मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडला गेला तर याला जबाबदार कोण? अशी भीती सीमाभागातील जाणकारांना पडली आहे. वास्तविक पाहता बेळगावमध्ये सीमालढ्यावर अभ्यास असणारे अनेक दिग्गज आहेत. त्यापैकी सांगायचे झाल्यास ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्रा. आनंद मेणसे, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी महापौर मालोजी अष्टेकर जे सीमाप्रश्नी न्यायालयीन लढ्याचे प्रमुख साक्षीदार आहेत असे अभ्यासू व्यक्ती असताना सत्तेच्या लालसेने काल परवा लढ्यात सहभागी झालेल्या “उथळ” व्यक्तीला परिसंवादाचे आमंत्रण देण्यामागचा हेतू काय? आयोजकांनी मध्यवर्तीला विश्वासात न घेता युवा कार्यकर्त्याला निमंत्रित करण्यापूर्वी त्यांचा सीमालढ्याचा अभ्यास? त्यांचे सीमालढ्यातील योगदान? याचा विचार केला होता का?
सीमालढा हे एक दीर्घकालीन चाललेले आंदोलन आहे. भारतीय इतिहासात एकमेव दीर्घकालीन चाललेले आंदोलन. त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. अश्या आंदोलनातून मत व्यक्त करण्यासाठी किंवा त्या आंदोलनाची दिशा, दशा किंवा पुढील वाटचाल यावर विचारमंथन करण्यासाठी एखाद्याला आमंत्रित करत असताना त्या मुळ संघटनेला कळविले जाते आणि त्या संघटनेकडून प्रवक्ते मागविले जातात. परंतु या परिसंवादासाठी जे प्रवक्ते मागविले गेले त्यासंबंधी कोणतीही सूचना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला दिलेली नाही. हा एक प्रकारचा राजकीय गुन्हाच म्हणावा लागेल.तसेच एक प्रकारे सीमालढ्यावर केलेला आघातच आहे. आयोजकांचा हा मनमानी कारभार साहित्य संमेलनाचे गांभीर्य जपू शकेल का? असा सवाल सीमावसियातून उपस्थित होत आहे. या संमेलनाचा आणखी एक वादाचा मुद्दा गोव्यातून उठला आहे की ज्या कवीचा मराठी भाषेला विरोध आहे त्याच कवीला संमेलनाला बोलावून मराठी भाषेची एक प्रकारे कुचेष्टाच केली आहे. तर परिसंवादासाठी निमंत्रित करताना शिखर समिती समजल्या जाणाऱ्या मध्यवर्तीला देखील विश्वासात घेतले नाही असे करून महाराष्ट्र सरकार आणि संमेलनाचे आयोजक काय साध्य करू इच्छित आहेत, असा प्रश्न जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
मुंबईमध्ये बसून सीमालढ्यावर लिहिलेल्या एका पुस्तकाचे विशिष्ट गटाने प्रमोशन केले होते. त्याचा परतावा म्हणून या परिसंवादात या स्वयंघोषित विद्वानाला निमंत्रण दिले आहे की काय अशी चर्चा सर्वत्र होत आहे. मुंबईत बसून बेळगावच्या राजकारणात हस्तक्षेप करू पाहणाऱ्या त्या लेखकाला आयोजकांनी जाब विचारला पाहिजे. नाहीतर यावर आंदोलन उभे राहील आणि हे साहित्य संमेलन नेहमीप्रमाणेच वादग्रस्त ठरेल. सीमाप्रश्न हुतात्म्यांच्या बलिदानावर उभा राहिला आहे. कुणाच्या सत्तेच्या अभिलाषेवर नाही. हे मुंबईकर लेखकाने लक्षात घ्यावे.
याच मुंबईस्थित जेष्ठ लेखकाने भाई एन. डी. पाटील यांच्यासह सीमाप्रश्नासाठी नेत्यांना दूषणे दिलं होतं.