बेळगाव : शेतकरी, कामगार आणि गरिबांना दरमहा ५ हजार भरपाई द्यावी व अन्य मागण्यांसाठी रयत संघाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी पोती जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. निदर्शकांनी आ. अनिल बेनके यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन सादर केले.
लॉकडाउन संकटाच्या काळात राज्य सरकारने शेतकरी, कामगार व गरिबांना पुरेशी मदत दिलेली नाही, मदत देण्याआधीच सरकारने लॉकडाउन उठवला आहे. शेतकरी, कामगार व गरिबांना केरळ, आंध्रप्रदेशच्या धर्तीवर मदत दिली पाहिजे अशी मागणी करत कर्नाटक राज्य रयत संघाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली. सरकारने त्वरित या घटकांना ५ हजार रुपये भरपाई द्यावी अशी मागणी निदर्शकांनी केली. यावेळी शेतकरी नेते सिदगौडा मोदगी म्हणाले, लॉकडाउनमुळे शेतकरी, कामगार व गरिब भुकेने मरत आहेत, शेतकरी मोठ्या आर्थिक संकट सापडले आहेत. केरळ सरकारने शेतकऱ्यांना २० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र राज्य सरकार मदत देत नाही. सरकारने शेतकरी, कामगार व गरिबांच्या कुटुंबाना प्रत्येकी ५ हजार रुपये मदत द्यावी. यासाठी आमदारांच्या हस्ते सरकारला निवेदन देण्यासाठी आमदारांची प्रतीक्षा करत आहोत. परंतु आमदार काही हाती लागत नाही आहेत. प्रत्येक मतदारसंघात आमदारांच्या घरासमोर आंदोलने करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी नेते, कार्यकर्त्यांनी या निदर्शनात भाग घेतला.