निकालाबाबत राज्यभरात उत्सुकता
बंगळूर : वादग्रस्त हिजाब प्रकरणाचा निकाल उच्च न्यायालय उद्या (ता. १५) जाहीर करणार आहे. या प्रकरणी सुनावणी पूर्ण करून उच्च न्यायालयाच्या त्रिसदस्य पीठाने निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाचा निकाल काय येणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
उडुपीमधील कापू तालुक्यातील हिजाब वाद जिल्ह्याच्या इतर भागांबरोबरच संपूर्ण राज्यात पसरला आणि देशभरात आता हा चर्चेचा विषय बनला आहे.
हिजाबसह गणवेश घालण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालय मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता अंतिम निकाल देणार आहे. सरन्यायाधीश ऋतुराज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित आणि न्यायमूर्ती खाजी जैबुन्निसा मोहियुद्दीन यांच्या पूर्ण खंडपीठाकडून निकाल देण्यात येणार आहे. यावर काय निकाल लागणार याची सर्वानाच उत्सुकता आहे.
शिक्षण संस्थांमधील हिजाबला आव्हान देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयायातील दाखल केलेल्या सर्व याचिकांवरील सुनावणी पूर्ण करून उच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.
मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित आणि काझी जैबुन्निसा मोहिउद्दीन यांच्या पूर्ण खंडपीठाने अनेक दिवस सुनावणी घेतली. राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी हा आता घटनात्मक प्रश्न बनला आहे. हिजाब बंदीबाबत काही मुस्लिम विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी २६ फेब्रुवारीला संपली होती. पूर्ण खंडपीठात सुमारे ११ दिवस सुनावणी सुरू होती. देवदत कामत यांच्यासह इतर ज्येष्ठ वकिलांनी हिजाबचे समर्थन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या याचिकेची बाजू मांडली. महाधिवक्ता प्रभुलिंग यांनी न्यायालयासमोर सरकारची बाजू मांडली आहे.
हिजाब परिधान करून वर्गात प्रवेश नाकारल्याबद्दल आव्हान देणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींच्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता.
न्यायालयाचा मध्यंतर आदेश
यापूर्वी उच्च न्यायालयाच्या त्रिसदस्य पीठाने तोंडी संदेश जारी केला होता, ज्यामध्ये म्हटले होते की अंतिम निकाल येईपर्यंत शाळा, महाविद्यालयात कोणताही धार्मिक ओळख असणारा पोशाख वापरता येणार नाही. मात्र, विद्यार्थी हिजाब घालून कॉलेजांमध्ये आले. हिजाब घालण्याच्या मागणीसाठी कॉलेजांसमोर निदर्शने करण्यात आली. उच्च न्यायालय अखेर काय निर्णय देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले असून निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.
बेळगाव जिल्ह्यात 144 कलम लागू
मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून बेळगाव जिल्ह्यामध्ये जमावबंदीचा अर्थात 144 कलम लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बजावला आहे. उद्या कर्नाटक उच्च न्यायालया मध्ये हिजाब संबंधी याचिकेवर निर्णय दिला जाणार आहे त्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंगळवार 15 मार्च रोजी सकाळी सहा वाजल्यापासून पुढचा आदेश येईपर्यंत बेळगाव जिल्ह्यामध्ये जमावबंदीचा आदेश बजावण्यात आलेला आहे. उद्या सकाळी सहा वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत बेळगाव जिल्ह्यामध्ये चारपेक्षा अधिक जणांनी जणांना एकत्र फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये हिजाब संबंधी याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालय निर्णय देणार आहे त्या निर्णयावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सावधानतेचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी बेळगाव जिल्ह्यामध्ये हा जमावबंदीचा आदेश बजावले ला आहे. दरम्यान सहाय्यक प्राध्यापक परीक्षा सुरू असतील असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
जमाव बंदीच्या आदेशात याचे पालन करावे लागणार आहे
1. बेळगाव जिल्ह्यामध्ये कोणत्याही कायदेशीर बाबीचा भंग करण्याच्या उद्देशाने चार किंवा अधिक जणांना एकत्र येण्यास बंदी
2. अंतिम संस्कार, हॉटेल आणि सिनेमा थिएटर्स वगळता कोणतीही सभा, मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
3. शस्त्रास्त्रे किंवा स्फोटक वस्तू घेऊन फिरण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.
4. जमावबंदी दरम्यान कुणीही फटाक्यांची आतषबाजी करू नये असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
5. शासकीय किंवा खाजगी वाहने अडवू नये असेही या आदेशात म्हटले आहे.