निपाणीत उन्हाची तीव्रता वाढली : पाणवठे पडू लागले कोरडे
निपाणी : गेल्या आठ दहा दिवसापासून निपाणी तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. डोंगर भागातील बहुतांश पाणवठे, तलाव डबकी, ओढे कोरडे पडत असल्याने उन्हाच्या वेळी सावलीच्या आधारासोबतच तहान भागविण्यासाठी विविध पक्षासह वन्यजीवांची पाण्याच्या शोधात धावाधाव सुरू झाली आहे.
निपाणी तालुक्यात काही डोंगराळ भाग आहे. या भागात रानडुक्कर, कोल्हे, ससे, रान मांजर,वानर या आणि इतर वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. तुरळक प्रमाणात मोर, बगळे, कावळे, करकोचे, चिमण्या व इतर पक्षीही आहेत. या शिवाय उन्हाळ्यात इतर ठिकाणाहून वेगवेगळे पक्षी तालुक्यात येतात. उन्हाळ्यात या वन्यप्राणी, पक्षांना डोंगर भागात पाणी उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी बांध बंधारे केले होते. परंतु जुन्या बंधाऱ्याची अनेक वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आली.त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर काही दिवसातच बहुतेक पाणवठे, ओढे कोरडे पडले आहेत.
एकेकाळी तालुक्यात विविध प्रकारच्या वृक्षांची गर्द झाडी होती. काळाच्या ओघात ती नष्ट झाली असली तरी गेल्या काही वर्षापासून शासन विविध योजना राबवून वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत वृक्ष लागवड मोहिम राबवण्यात येत आहे. पण ती यशस्वी होत नसल्याने परिसर उजाडच रहात आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढत असल्याने सावलीचा आधार शोधण्यासह पाण्यासाठी या वन्यजीवांना दूरदूर पर्यंत धावाधाव करावी लागत असल्याचे चित्र तालुक्यातील डोंगराळ भागात दिसतआहे.
—–
वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावात
कुठे थोडे फार पाणी दिसल्यास पक्षी त्यात डुबक्या मारत बागडत आहेत. पोपट व वानरांचे जथ्थे गाव, वस्त्यांमध्ये धाव घेताना दिसत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी वन विभागासह वन्यप्रेमी संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.