संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव जिल्ह्याचा विस्तार वाढला आहे. कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून बेळगांवचा उल्लेख केला जातो. बेळगांव जिल्हा विभाजनात प्रामुख्याने गोकाकचा नामोल्लेख केला जात असल्याने गोकाकच जिल्हा होणार यात तिळमात्र शंका नसल्याचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते संकेश्वरला धावती भेट देऊन शिवकृपा कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.-ते पुढे म्हणाले, वास्तविक पाहता गोकाक जिल्ह्याची रचना तत्कालीन मुख्यमंत्री जे. एच. पटेल यांनी १९९४ मध्ये केली होती. गोकाक जिल्हा घोषित करण्यात त्यावेळी कांहीं तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे गोकाक जिल्ह्याची घोषणा होता-होता टळली आहे. बेळगांव जिल्ह्याचे विभाजन करतांना प्रामुख्याने गोकाकलाच अग्रक्रम द्यावा लागणार आहे. मंत्री उमेश कत्ती यांनी चिकोडी,-बैलहोंगल जिल्हा व्हावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी गोकाकचा नामोल्लेख करणे मुद्दाम टाळले आहे. ही गोष्ट खटकणारी ठरली आहे. चिकोडी जिल्हा मागणीसाठी सहकारी नेते दिवंगत बी.आर. संगापगोळ शेवटच्या श्वासापर्यंत लढले. त्यांचे चिकोडी जिल्ह्याचे स्वप्न साकार व्हावे यात दुमत नाही. पण भौगोलिकदृष्ट्या विचार करता गोकाक जिल्हा करणे योग्य ठरणार आहे.
कन्नड संघटनांचा विरोध..
बेळगांव जिल्हा विभाजनात कन्नड संघटनांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. बेळगांव जिल्हा विभाजन करता कामा नये, अशी ठाम भूमिका कन्नडपर संघटनांनी घेतली आहे. बेळगांव जिल्ह्यात सीमाप्रश्नांवरुन कन्नड-मराठी भाषावाद आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजनच नको असे कन्नड संघटनांची मागणी आहे. त्याचा विचार करता बेळगांव जिल्हा विभाजन अजून कांहीं वर्षे तर होणार नाही, असे वाटते. सरकारने बेळगांव जिल्हा विभाजन करण्याचा निर्णय घेतला तर गोकाक जिल्हा करणेच सरकारला क्रमप्राप्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सहकारी नेते बाळकृष्ण हतनुरी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, नगरसेवक ॲड. प्रमोद होसमनी, गंगाराम भूसगोळ, निपाणीचे नेते उत्तम पाटील, इचलकरंजीचे नेते सागर चाळके, बंडू सुर्यवंशी, राजेश गायकवाड, आणप्पा संघाई, राहुल हंजी उपस्थित होते.