बेळगाव : आजकाल बारा ते सतरा वयोगटातील मुले ही वेगळ्या वळणावरती जाताना आहेत, त्यांना समुपदेशनाची अत्यंत गरज आहे. जायंट्स सारख्या संस्थांनी यात पुढाकाराने काम करावे, असा सल्ला प्राध्यापिका ॲड. सरिता पाटील यांनी दिला.
एसपीएम रोडवरील शिवम हॉलमध्ये संपन्न झालेल्या जायंट्स सखीचा अधिकारग्रहण कार्यक्रम प्रसंगी त्या प्रमूख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
प्रत्येक सामाजिक संघटनेने आपापल्या परिसरातील शाळांना भेटी देऊन तेथील शिक्षकांशी चर्चा केल्यास हल्ली चालू असलेली परिस्थिती समजेल आणि त्यानुसार आपल्याला काम करता येईल. या बाबतीत सांगायचे झाल्यास समाज कुठेतरी कमी पडतोय असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी व्यासपीठावर विशेष समिती सदस्य मोहन कारेकर फेडरेशन सहाच्या अध्यक्षा तारादेवी वाली, विभागीय संचालक मदन बामणे नवनिर्वाचित अध्यक्षा चंद्रा चोपडे, मावळत्या अध्यक्षा नीता पाटील, सचिव सुलक्षणा शिन्नोळकर आणि शीतल पाटील उपस्थित होत्या.
जायंट्सच्या प्रथेप्रमाणे सर्वप्रथम जायंट्स दिया प्रज्वलित करून जायंट्सची प्रार्थना म्हणण्यात आली.
यानंतर चंद्रा चोपडे यांनी मान्यवरांचे स्वागत भेटवस्तू आणि देऊन केले.
ॲड. सरिता पाटील आणि इतरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यानंतर सखीच्या सदस्यांनी
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेतुन सेवा कुणाची आणि कशी करावी हे सांगितले.
शीतल पाटील यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले.
निता पाटील यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला.
जायंट्स फेडरेशन सहाचे विभागीय संचालक मदन बामणे यांनी प्रथम अर्चना कंग्राळकर, शिला खटावकर, सीमा वर्णेकर, वैशाली भातकांडे, स्मिता पाटील, प्राची होनगेकर, मंजिरी पाटील, गौरी गोठीवरेकर, मनिषा वांद्रे, नेहा पाटील, लिला मुंगारी, सरिता देसूरकर, गार्गी काळे या तेरा नविन सदस्यांना शपथ दिली.
त्यानंतर उपाध्यक्ष विद्या सरनोबत, अर्पणा पाटील, सचिव सुलक्षणा शिन्नोळकर आणि खजिनदारा अर्चना पाटील संचालिका ज्योती सांगुकर, ज्योती पवार, राजश्री हसबे, सुर्वणा काळे, शितल नेसरीकर, सुजाता देसूरकर यांना शपथ दिली.
शेवटी अध्यक्षा चंद्रा चोपडे यांना शपथ दिली.
मोहन कारेकर आणि तारादेवी वाली यांनी नविन सदस्यांना किट प्रदान केले आणि सर्वांना पिन लावून गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.
यानंतर मदन बामणे यांनी जायंट्स सखींविषयी बोलताना, ही संघटना खूप उंचीवर गेली असून भविष्यात आपणाला सामाजिक कार्य असताना कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. रंजल्या गांजलेल्या लोकांसाठी धावून जायचं आहे. महिला मुलींसाठी काम करायचं आहे असे सांगितले.
यावेळी मोहन कारेकर आणि तारादेवी वाली यांनी जायंट्स सखीच्या घौडदौडी बद्दल कौतुक करून अभिनंदन केले आणि भविष्यात असेच चांगले कार्य करावे अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी मदन बामणे यांचा स्मृतिचिन्ह, शाल, नारळ आणि गुलाबपुष्प देऊन खास सन्मान करण्यात आला. गेल्या पाच वर्षात सखीला सर्वोतोपरी केलेले सहकार्य आणि सामाजिक चळवळीतील त्यांचे योगदान, कोविड काळातील त्यांची स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन केलेले कार्य या साऱ्यासाठी हा सन्मान करण्यात आला.
नूतन अध्यक्षा चंद्रा चोपडे यांनी आपण पुढील वर्षभर तुम्हा सगळ्यांचा सहकार्याने समाजोपयोगी कार्य करूया असे सांगितले.
उपाध्यक्षा विद्या सरनोबत यांनी आभार प्रदर्शन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर यांनी केले. या कार्यक्रमाला जायंटस् मेनचे पदाधिकारी आणि सखीच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.