कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काल झालेल्या शिवसेना मेळाव्यात शिंदे गटातील बंडखोर माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर बोचरी टीका केली होती. नाना पटोलेंना घरी जेवायला बोलवून नंतर त्याचे पैसे बंटी पाटलांकडून घेतल्याचे मला समजल्याचे विनायक राऊत म्हणाले होते.
या टीकेनंतर आता राजेश क्षीरसागर यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर पलटवार करताना गंभीर आरोप केला आहे. विनायक राऊत हे ज्या ठिकाणी जातील, त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय जात नाहीत. निवडणुका असो किंवा कोणताही कार्यक्रम असू दे त्यांची बॅग तयार ठेवायला लागते असा गंभीर आरोप क्षीरसागर यांनी विनायक राऊत यांच्यावर केला आहे. दुसर्यांचे ऐकून माझ्यावर करत असतील, तर शिवसेना संपवण्याचे कंत्राट विनायक राऊत यांनी घेतल्याचे ते म्हणाले.
दोन्ही शिवसेना खासदार आमच्यासोबत येतील
विनायक राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदारांवरून मोठा दावा केला आहे. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने लवकरच बंडखोर शिंदे गटात दिसतील, असा दावा केला आहे. काल झालेल्या शिवसेना मेळाव्याला हे दोन्ही खासदार अनुपस्थित होते. संजय मंडलिक यांनी दिल्लीत असल्याचे सांगितले होते. धैर्यशील माने तब्येत बरी नसल्याने उपस्थित नव्हते.
बंटी पाटील म्हणाले, मग मीच माझ्या घरी जेवणं दिलं असतं
दरम्यान, विनायक राऊत यांनी क्षीरसागर यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून माजी मंत्री सतेज पाटील यांनी खुलासा केला आहे. त्यांनी जेवणाच्या बिलावरून प्रतिक्रिया देताना सांगितले की, हा राजकीय आरोप असू शकेल, पण तस काही नाही. त्यांनी घरी जेवायला बोलावलं होतं. नाना पटोले आणि राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात एकत्र काम केलं आहे, त्यामुळे राजेश क्षीरसागर यांनीच सांगितलं होतं. नाना पटोले यांना जेवण्यासाठी घरी बोलावलं आहे, तुम्हीही या असं सांगितलं होत. त्यामुळे तसा काही विषय नाही. त्यांच्या घरचा जेवणाचे बिल मी द्यायचा काही संबंध नाही. एवढ्या खाली टीका संयुक्तिक टीका बरोबर नाही. तो शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा असू शकतो. तसे असतं तर मी माझ्या घरी जेवणं दिलं असतं तसा काही विषय नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो.