बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने कर्नाटक उत्तर प्रांतस्तरीय कार्यशाळा बेळगाव येथे आय.एम.ई.आर.च्या सभागृहात उत्साहात पार पडली. कार्यशाळेस कर्नाटक उत्तर प्रांतच्या सर्व शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. रविवारी सकाळी १० पासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकूण चार सत्रांमध्ये कार्यशाळा झाली.
प्रारंभी कर्नाटक उत्तर प्रांतचे प्रभारी पुरूषोत्तमदास इनाणी, प्राचार्य व्ही. एन. जोशी, प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर, सचिव एस. एस. हिरेमठ, बेळगाव शाखाध्यक्ष विनायक मोरे यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संगीता बांदेकर कुलकर्णी यांनी वंदे मातरम् प्रस्तुत केले. बेळगाव शाखाध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांताध्यक्ष स्वाती घोडेकर यांनी कार्यशाळेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. एन. बी. देशपांडे यांनी परिषदेची ध्येय-धोरणे सांगितली. गोविंद कुलकर्णी यांनी परिषदेच्या शिष्टाचारविषयी माहिती दिली.
त्यानंतर विविध चार सत्रांमध्ये डॉ. जे. जी. नाईक यांनी आदर्श शाखा कशी असावी, याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. व्ही. बी. यलबुर्गी यांनी परिषदेच्या विविध राष्ट्रीय सेवाप्रकल्पांची माहिती दिली. विनायक मोरे यांनी परिषदेच्या राष्ट्रीय पातळीवर समूहगायन स्पर्धेबाबत विस्तृत विवेचन केले. राम मोहन आणि स्वामीराव देशपांडे यांनी संस्कार कार्यक्रमांविषयी मार्गदर्शन केले. सहना हिरेमठ यांनी महिला सबलीकरण, ग्रामविकास बाबत रामकृष्ण बुधनी आणि अवनी मोटा यांनी प्रभावी प्रसारमाध्यम याविषयी माहिती दिली.
शेवटच्या सत्रात प्रांतप्रभारी पुरूषोत्तमदास इनानी यांनी परिषदेची शिस्त, आर्थिक बाबी आणि एकंदर कार्याविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यानंतर ज्येष्ठ सदस्य प्राचार्य व्ही. एन. जोशी यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. अरुणा नाईक यांनी केले. सचिव के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. कार्यशाळेस कर्नाटक उत्तर प्रांतच्या सर्व शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी विनायक घोडेकर, नामजी देशपांडे, सुभाष मिराशी, जनार्दन नायक, वदिंद्र यलबुर्गी, डी. वाय. पाटील, सुहास सांगलीकर, रामचंद्र तिगडी, पी. एम. पाटील, गणपती भुजगुरव, नामदेव कोलेकर, शुभांगी मिराशी, उषा देशपांडे, उमा यलबुर्गी, प्रिया पाटील, अक्षता मोरे, नंदिनी पाटील, स्मिता भुजगुरव तसेच बेळगाव भारत विकास परिषदेच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.