निपाणी : तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांची कोल्हापूर येथे नु पॅलेसमध्ये सदिच्छा भेट घेतली. श्रीमंत शाहू महाराज यांची कोल्हापूरच्या लोकसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला, त्यानंतर सीमाप्रश्नी आपण संसदेत मुद्दा उपस्थित करून संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून सीमाभागाधील 865 गावांचा समावेश महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावा याविषयी सविस्तर मत आपण संसदेत मांडावे म्हणून निवेदन देण्यात आले. घटनेच्या कलम तीन अंतर्गत केंद्र सरकारला दोन्ही राज्यातील सीमावाद सोडविण्याचा अधिकार आहे आणि तो केंद्र सरकारने सोडवावा म्हणून आपण प्रश्न मंजुषा कार्यक्रमात सीमाप्रश्नाचा विषय मांडावा म्हणून निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने काश्मीर मधील 370 कलम हटवून बरेच वर्षाचे स्वप्न भारतीय नागरिकांचे पूर्ण केले आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न सोडवून सीमाभागातील सर्व सामान्य मराठी जनतेला योग्य न्यायाची अपेक्षा आहे ती पूर्ण करून गेली 67 वर्षे झाली. सीमाप्रश्न ताटकळत रेंगाळत आहे त्याची सोडवणूक करावी.
यावेळी निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. अजित पाटील, कार्याध्यक्ष श्री. बंडा पाटील, खजिनदार व प्रवक्ते नेताजी पाटील, संतोष निढोरे, गणेश माळी व राजकुमार मिस्त्री, सुधाकर माने पदाधिकारी उपस्थित होते.