बेळगाव : पावसामुळे बिकट झालेल्या बेळगाव-बाची रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. गांधी चौक ते कुद्रेमानी या गावापर्यंतच्या रस्त्याची चाळण उडाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामकाजाला अखेर सुरुवात झाली आहे.
गेल्या १५ दिवसांपूर्वी रस्त्याच्या संपूर्ण अवस्थेबाबत अहवाल देण्याच्या सूचना मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रभर जागेची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. हिंडलगा-सुळगा-तुरमुरी-बाची या गावांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असून, येथून हजारो वाहने आणि नागरिक दररोज ये-जा करतात. रविवारी स्वतः घटनास्थळी दाखल झालेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हेही दाखल झाले. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी उपस्थिती दर्शविली.
यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांनी स्वतः जातीने लक्ष घालून खड्डे बुजवून घेतले. यावेळी मंत्रीमहोदयांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 15 कोटी रुपये मंजूर केले. पावसाळा संपताच कामाला सुरुवात करावी. तोपर्यंत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून खड्डे त्वरित बुजवावीत करावेत, अशी सूचना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी केली. रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे या रस्त्यावरून वाहने जाऊ शकत नाहीत, पादचाऱ्यांनाही त्रास होत आहे. यामुळे या रस्त्यावरील खड्डे संपूर्णतः बुजवावेत, रस्त्याचे कामकाज सुरु केल्यांनतर गुणवत्तापूर्ण काम करावे, वेळेत कामकाज पूर्ण करावे, पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना कोणत्याही अडचणी उद्भवू नयेत, अशा सूचना विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोबरद, सहायक कार्यकारी अभियंता शशिकांत कोळेकर व स्थानिक नागरिक उपस्थित होते.