निपाणी (वार्ता) : मराठी ही मुळातच अभिजात भाषा असतानाही त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नव्हता. या संदर्भात केंद्र शासनाचे जे निकष असतात ते निकष पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॉ. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने सखोल अभ्यास करून आवश्यक सर्व अटींची पूर्तता करून केंद्र शासनाला आपला अहवाल पाठवला होता. त्यानंतर केंद्र सरकारने तत्वतः अभिजात दर्जा देण्याचे मान्य केले.
पण तो लवकर मिळत नव्हता. अखेर घटस्थापने दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे निपाणी येथे बैठक घेऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी गेली अनेक वर्ष सातत्याने सीमा भागातील साहित्यिक, कलाकार, कलावंत, मराठी भाषिकासह विविध शैक्षणिक संस्था, विविध साहित्य संस्था, निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी यासाठी निपाणी भागातून ही वेळोवेळी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्याशी पत्रव्यवहार, मोर्चे, लोकलढे, उभे केले. शिवाय यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समितीने सातत्याने पाठपुरावा केला. त्याचवेळी संसदेत अनेक खासदारांनी वेळोवेळी हा प्रश्न उपस्थित केला. या सर्व गोष्टींची गांभीर्याने दखल घेऊन घटस्थापनेदिवशी केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचे जाहीर केले.
निपाणीमध्ये या प्रश्नासाठी निपाणी भागातून राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा सभापती, केंद्रिय सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय सांस्कृतिक मंत्री यांच्याशी सातत्याने विविध मार्गाने पाठपुरावा करण्यात आला होता. या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैठक घेण्यात आली.
साहित्यिक अजित सगरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मराठी भाषा तज्ञ प्रा. नानासाहेब जामदार यांनी, मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या निर्णयाचे स्वागत करून, अभिजात दर्जा काय असतो. त्याचे फायदे याबाबत विचार मांडले. यावेळी बाबासाहेब मगदूम, जयराम मिरजकर, प्रा. एन. आय. खोत, सुशीलकुमार कांबळे, साहित्यिक कबीर वराळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
बैठकीस प्रशांत गुंडे, प्रा. नवीजन कांबळे, किरण कांबळे, अकबर कांबळे, माजी सैनिक विजय निर्मळे, नंदू माने, रवी शिंदे उपस्थित होते.