बेळगाव : रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करून देखील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दखल घेत नसल्यामुळे शेवटी गेल्या सोमवारी सुळगा (येळ्ळूर) गावातील सामाजिक कार्यकर्त्यांवर येळ्ळूर-सुळगा ते राजहंसगड रस्त्यावरील खड्डे श्रमदानाने बुजवण्याची वेळ आली.
येळ्ळूर (सु.) ते राजहंसगड हा रस्ता देसुर ते नंदीहळ्ळी रस्त्याला जोडला गेल्याने तो पुढे नंदीहळ्ळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी तसेच देसूर मार्गे खानापूर महामार्गाला जोडला गेला आहे. खानापूरकडे जाण्यासाठी धामणे, बस्तवाड, हलगा येथील वाहनधारक सुळगा (येळ्ळूर) रस्त्यानेच ये -जा करत असतात. या पद्धतीने मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या या रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याची वाताहत झाली आहे. सदर रस्त्यावर ठिकठिकाणी अपघाताला निमंत्रण देणारे मोठे खड्डे पडले असल्यामुळे वाहन चालकांना विशेष करून दुचाकी चालकांना तारेवरची कसरत करावी लागते.
खराब झालेला हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा यासाठी बेळगाव ग्रामीणच्या आमदार आणि विद्यमान महिला व बालकल्याण मंत्र्यांकडे अनेक वेळा तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. या पद्धतीने लोकप्रतिनिधी व अधिकारी देखील दुर्लक्ष करत असल्याने तसेच खराब रस्त्यामुळे ये -जा करणाऱ्या वाहन चालकांना होणारा त्रास मनस्ताप लक्षात घेऊन सुळगा (येळ्ळूर) येथील सामाजिक कार्यकर्ते स्वखर्चातून सदर खराब रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कार्य करत आहेत. स्वखर्च करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने हार्डमुरूम आणून मजूर लावून रस्त्याचे पॅचवर केले जात असून यामुळे वाहनधारक आणि सुळगा गावातील नागरिकांकडून संबंधित कार्यकर्त्यांची प्रशंसा होत आहे.