बेळगाव : 4 जून 2022 हा दिवस मुख्यत्वे मुलांचा संरक्षण दिवस. जोर जबरदस्तीचे बळी म्हणून जागतिकरित्या सर्वत्र साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चे अध्यक्ष श्री. शिव कुमार हिरेमठ, संचालक श्री. पद्म प्रसाद हुली अन्य श्री. राहुल पाटील (एनजीओ) व एसडीएमसीचे अध्यक्ष यांनी नुकतीच बेळगाव पासून सुमारे 35 किलोमीटरवर असलेल्या गोल्याळी गावाला (तालुका खानापुर जिल्हा बेळगाव) भेट दिली. भेटीचे मुख्य कारण येथील असलेली शिक्षणाबद्दलची परिस्थिती, आठवी नववी व दहावीचे शिक्षण घेणे करता गोल्याळी परिसरातील मुला-मुलींना रोज आठ किलोमीटरचा पल्ला चालत जाऊन कणकुंबी येथे असलेल्या हायस्कूलमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे अन् हा पल्ला घनदाट जंगलामधून जातो व वन्य श्वापदांची भीती असते ते रस्त्यात बसून असतात त्यावेळी एक ते दोन तास जीव मुठीत ठेवून मुलांना थांबावे लागते. पावसाळ्यात तर त्रेधातिरपीट उडत असते. गोल्याळी गाव ते कणकुंबी जाणे-येणे करता केवळ एक बसची व्यवस्था आहे जी शिकणाऱ्या मुलांना जाणे-येणे करता सुलभ नाही.
या परिस्थितीचे अवलोकन करून जायंट्सचे अध्यक्ष श्री. शिवकुमार हिरेमठ व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुलांची व ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांच्यामध्ये हायस्कूलला जाणाऱ्या मुलांच्या संरक्षणाबद्दल जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला ग्रामपंचायत सदस्यांना मुलांच्या शिक्षणसाठी पर्यायी व्यवस्था करणेबद्दल जायंट्सच्या माध्यमातून विनंती केली.
त्याचबरोबर जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून गावातील प्राथमिक शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांना झाडे लावण्याबद्दलचे मार्गदर्शन केले. शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलांमध्ये बालपणापासूनच झाडे लावण्याची व त्याचे संरक्षण करण्याची गोडी निर्माण झाली तर पुढील अनंत काळ सजीव जातीला तापमानाचे भय जाणवणार नाही, असे प्रतिपादन जायंट्सचे अध्यक्ष श्री. शिवकुमार हिरेमठ यांनी या ठिकाणी व्यक्त केले व प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक रोपटे देऊन आपल्या घरासमोर लावण्यास सांगितले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी गावातील ग्रामस्थ, संचालक श्री. पद्म प्रसाद हुली, राहुल पाटील व एसडीएमसीचे अध्यक्ष उपस्थित होते.