बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि पिरनवाडी ग्रामस्थांच्यावतीने मा. जिल्हाधिकारी यांना नागरी समस्यांच्या बाबतीत निवेदन देण्यात आले.
मागील काही वर्षांपासून रस्ता रुंदीकरण करताना आणि विविध विकासकामे राबवताना जैतनमाळ, खादरवाडी, उद्यमबाग परिसरातून वाहणारे तिन्ही नाले पिरनवाडी येथे जोडण्यात आले आहेत, त्यामुळे महानगरपालिकेच्या हद्दीतून येणारा सर्व पाण्याचा प्रवाह पिरनवाडी याठिकाणी येऊन पिरनवाडी नाका, सिद्धेश्वर गल्ली, मारुती नगर आदी परिसरातील घरामध्ये पाणी भरत आहे, त्यामुळे येथील नागरिकांच्या साधन संपत्तीचे नुकसान होत आहे. सोबतच आरोग्य सुद्धा धोक्यात येत आहे. दरवर्षी निवेदन देऊन प्रशासनाकडे या समस्यांबाबत पाठपुरावा करून देखील काहीही तोडगा काढण्यात आला नाही, तेव्हा सदर नाल्यांचे सर्वेक्षण करुन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी दौरा करून नाल्यामुळे उद्भवणारी समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी अशा आशयाचे निवेदन मा. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जर तरीही याकडे दुर्लक्ष केल्यास लवकरच रस्ता रोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, नारायण मुचंडीकर, मनोहर हुंदरे, सर्वेश रामनाथकर, शीतल जाधव, मारुती पेडणेकर, महादेव काळगे, राजू कदम, आकाश भेकणे, आशिष कोचेरी, वासू सामजी, उदय लोहार, रमेश चलवादी, राजू जोशी, कृष्णा राठोड, पूजा जाधव, गिरीजा भावे आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2021/07/IMG-20210726-WA0125-660x330.jpg)