बेळगाव : शेतात असणाऱ्या कूपनलिकांचे पाणी उपसा करण्यासाठी हेस्कॉमने वीज पोहोचविण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था केली. परंतु योग्य नियोजनाअभावी उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सोसावा लागत असल्याचे प्रकार शहापूर, अनगोळ आदी भागात दिसून येत आहेत.
शहापूर शिवारात असणारा इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर जमीनदोस्त झाला आहे तर अनगोळ शिवारातील इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बर्स्ट झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पावसाळ्याच्या दिवसात ऐन हंगामाच्या वेळी उद्भवलेल्या या समस्येमुळे शेतकऱ्यांना जीव मेटाकुटीस आला आहे. हेस्कॉमने शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था केली आहे. मात्र हे ट्रान्सफॉर्मर सुरक्षित राहावेत यासाठी कोणताही पूर्व अभ्यास केला नाही. शिवाय योग्य नियोजन नसल्याने वारंवार असे प्रकार घडत आहेत. ट्रान्सफॉर्मर उभारताना आधी जमीनीचा अभ्यास करून भरती घालून नंतरच खांब उभारुन ते भक्कमपद्धतीने उभारणे गरजेचे असते. मात्र गडबडघाईत उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरचा दिवसागणिक त्रास वाढत चालल्याचे दिसून येत आहे. ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आल्यानंतर चार ते पाच वर्षातच हे ट्रान्सफॉर्मरची कोसळू लागतात. अशा धोकादायक स्थितीत असलेल्या विद्युत भारित ट्रान्सफॉर्मरमुळे शेतकऱ्यांच्या तसेच पावसाळ्यात भांगलण करण्यास गेलेल्या महिलांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. यासह पावसाने यंदाही दडी मारली तर शेतकऱ्यासमोर पाण्यामुळे अनेक संकटे उभी राहण्याची शक्यता आहे. शेतशिवारात घडलेल्या प्रकाराबाबत अनेकवेळा हि बाब हेस्कॉम विभागाच्या निदर्शनात आणून देण्यात आली आहे. त्यामुळे हेस्कॉमने युद्धपातळीवर ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करून ते पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.