बेळगाव : राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्याचे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना अटक करून कारवाई करण्यात यावी आणि मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आज बेळगावात भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
गुरुवारी बेळगावमधील राणी चन्नम्मा चौकात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात छेडलेल्या आंदोलनात धरणे धरले. काँग्रेसने स्वतः चोरी करून आता उलट्या पावली पळण्याचा विडा उचलला आहे. राज्यपाल पद सन्माननीय आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांविरोधात खटला चालविण्याची परवानगी देताच बांग्लादेशच्या धर्तीवर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला. मुख्यमंत्री सिध्र
सिद्धरामय्याना संविधानाचा विसर पडला असून राजीनाम्याची वेळ जवळ आल्याने मुख्यमंत्री घाबरू लागले आहेत. मात्र ते जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी दिला.
येडियुरप्पा यांच्याकडे बोट दाखवून त्यांच्यावर आरोप करणारे सिद्धरामय्या एका घोटाळ्यात अडकले आहेत, सिद्धरामय्या यांनी राज्याची फसवणूक केली आहे. त्यांना थोडीही लाज असेल तर मुख्यमंत्री पद त्यांनी सोडावे. बांग्लादेशच्या धर्तीवर आंदोलन करण्याचे वक्तव्य करणारे वि. प. सदस्य इव्हान डिसोझा यांनी भारत हा बांगलादेश नाही, हे लक्षात ठेवावे, असा इशारा माजी आमदार संजय पाटील यांनी दिला.
भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चूक केली असून, नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा. राज्यपालांविरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे. बांग्लादेशाप्रमाणे आंदोलन करण्याचा इशारा देणारे त्यांचे विधान त्यांची मानसिकता दर्शवते, अशी टीकाही त्यांनी केली.भाजप नेत्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी महादेवाप्पा यादवाड, विश्वनाथ पाटील, मुरुगेन्द्रगौडा पाटील, डॉ. सोनाली सरनोबत, लीना टोपाण्णावर, उज्वला बडवाण्णाचे, गीता सुतार आदींसह भाजप शहर, ग्रामीणचे पदाधिकारी, भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.