खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गस्टोळी येथील गेल्या सात आठ वर्षांपूर्वी शेतकरी वर्गाच्या पिकाला पाण्याची व्यवस्था व्हावी. यासाठी मंग्यानकोप ग्राम पंचायत हद्दीतील शिवाजी नगरातील गोमारी तलावाला जोडलेल्या गस्टोळी कॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र नुकताच गस्टोळी कॅनल हा कोसळला. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाच्या पिकाच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबतची माहिती मिळताच खानापूर तालुका विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी नुकताच एकमेव अशा गस्टोळी कॅनलला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, तालुक्यात गस्टोळी कॅनल हा प्रसिद्ध आहे. गेली सात ते आठ वर्षे या कॅनलचा वापर करण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामाचा कॅनल असल्याने तो काही वर्षांत कोसळला.
यामुळे भविष्यात या भागातील शेतकरी वर्गाला पिकासाठीच्या पाणाचा वापर होणे कठीण होणार आहे. तेव्हा तालुक्याच्या आमदारांनी तसेच संबंधित खात्याच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून लवकरात लवकर कॅनलची दुरूस्ती करावी, अशी मागणी केली.
संबंधित कॅनलची त्वरीत दुरूस्ती करावी. अन्यथा या भागातील शेतकरीवर्गाचा मोर्चा तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषणाला बसणार. तेव्हा संबंधित खात्याने येत्या काही दिवसात गस्टोळी कॅनल संदर्भात पाऊले उचलावी. अन्यथा याचा परिणाम वाईट होईल. असे विचार मांडले. यावेळी ते म्हणाले की, खानापूर तालुक्यातील गोमारी तलाव शेतकरी वर्गाला वरदान आहे. सदर तलाव हा मंग्यानकोप ग्राम पंचायतीच्या हद्दीतील शिवाजी नगरात गोमारी तलाव म्हणून गेल्या 70 वर्षापूर्वी उभारण्यात आला.
गोमारी तलाव तालुक्यात आकाराने मोठा आहे. शिवाय गोमारी तलावाची प्रसिद्धी मोठी आहे. नुकताच या तलावला जोडलेला गस्टोळी कॅनल कोसळून शेतकरी वर्गाच्या शेतीला होणार पाणी पुरवठा बंद झाला आहे.
गोमारी तलाव हा जवळपास 800 ते 1000 हेक्टर जमिनीत विस्तारला आहे. त्यामुळे या पाण्याचा वापर भुरूनकी, मंग्यानकोप, कक्केरी, चुंचवाड आदी ग्राम पंचायतीच्या हद्दीतील अनेक खेड्याना होत आहे.
त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाला गोमारी तलाव म्हणजे वरदान ठरला आहे. गोमारी तलावात बाराही महिने पाणी भरून राहते. या भागातील शेतकरी वर्गाला वर्षभर पाण्याची समस्या नसते. वर्षभर पिके घेतली जातात. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग सुखी समाधानी आहे.
या भागातील शेतकरी भात, ऊस पिकाबरोबर भाजीपाला व इतर फळाचे उत्पन्न घेतो. त्यामुळे वर्षभर शेतकरी वर्गाला उत्पन्न मिळते. मात्र नुकताच कोसळलेल्या गस्टोळी कॅनलमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरले आहे.
गस्टोळी कॅनल सरकारने त्वरित उभारून शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी या भागातील शेतकरी रवि मादार, यल्लापा नलवडे, सोपान्ना तिपन्नावर, ईरशाद तिगडी, अर्जुन सातनोळकर, मुनाफ टेगडी आदी उपस्थित होते.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2022/02/491-660x330.jpg)