![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2021/07/IMG-20210724-WA0077-1024x462.jpg)
खानापूर (प्रतिनिधी) : गुरूवारी व शुक्रवारी खानापूर शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावुन प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे अनेकाचे संसार उघड्यावर पडले आहे.
नुकसान झालेल्या तलावाला मोठे भगदाड पडल्याने मेरडा करजगी मार्गावरील तलावाचा बांध फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या मोठ्या पावसामुळे तलावात पुरेपूर पाणी साठा होत आहे त्यातच तलावाच्या बांधाच्या मधोमध भलेमोठे भगदाड पडून रस्ता खचला आहे त्यामुळे भीती निर्माण झाली आहे. तलावातील पाणीसाठा वाढल्यास तलावाचा बांध फुटून शेकडो एकर जमिनीला धोका संभाव्य आहे. यासाठी याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य महाबळेश्वर पाटील ग्रामपंचायत पाटील यांनी पाहणी करून सदरचा अहवाल तहसीलदार तसेच लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविला आहे
खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या काठी असलेल्या मच्छिमार्केटला नदीच्या पुराचा फटका बसला आहे. शुक्रवारी संपूर्ण मच्छिमार्केटला पाण्याने विळखा घातला होता. त्यामुळे सगळी दुकाने भुईसपाट झाली. यात मासळी विक्रेत्यांचेही प्रचंड नुकसान झाले.
जळग्यात तलाव फुटून शेतीचे नुकसान
जळगे (ता. खानापूर) गावचा तलाव अक्षरशा फुटून भात शिवाराचे मोठे नुकसान झाले.
जळगे गावापासुन जवळच सार्वजनिक तलाव आहे. शुक्रवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने या तलावात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे तलावाचा बांध फुटला. व तलावाच्या खालच्या बाजूला असलेली भात जमिन वाहून गेली.
त्यामुळे जळगे गावच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांतुन हळहळ होत आहे.
याशिवाय तालुक्यातील अनेक गावच्या रस्त्याचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
तेव्हा शेतकऱ्यांसाठी, ज्याची घरे कोसळली असतील, मासळी विक्रेते आदीना आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी खानापूर तालुक्यातील जनतेतून होत आहे.