खानापूर (प्रतिनिधी) : घोटगाळी (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या कामकाजात सुव्यवस्थितपणा नाही. कामकाजात गैरप्रकार होत असल्याचा दावा करत घोटगाळी परिसरातील नागरिकांनी पंचायतीला जाब विचारण्यासाठी नुकताच घेराव घातला. यावेळी सदस्यांकडून झालेला गैरकारभारासंदर्भात विचारणा करताच ग्राम पंचायत अध्यक्ष संतोष मिराशी, सदस्य लोकांना समर्पक उत्तरे देण्यास अयशस्वी ठरले आणि लागलीच तेथून काढता पाय घेतला.
यावेळी घोटगाळी ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य ग्रामपंचायतमधील रोजगार हमी योजनेच्या काही मेटना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यासाठी आले, आणि ग्रामसभा घेऊन ठराव पास करून नवीन मेटची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर काही ग्रामपंचायत सदस्यांनी रोजगार हमी योजनेसाठी वाढीव बोगस हजेरी न घातल्यानेच त्या मेटना काढून टाकण्यात येत असल्याची माहिती दिली. यासंदर्भात खानापूर तालुका पंचायतीच्या अधिकार्यांना लेखी तक्रार देऊन ही घोटगाळी ग्रामपंचायतीचे अधिकारी आणि सदस्यांनी आपल्या म्हणण्यानुसार काम करणार्या मेटना कायमस्वरूपी ठेऊन त्यांच्या मनाविरुद्ध वागणार्या मेटना काढण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात घोटगाळी गावचे रहिवासी आणि खाजगी शाळेतील शिक्षक खेमराज गडकरी यांनी ग्रामपंचायतच्या गैरकारभाराबद्दल आठ महिन्यांपूर्वी चौकशीसाठी तक्रार केली असून अजून न्याय मिळाला नाही. त्या चौकशीसंदर्भात पुरावे नष्ट करण्यासाठी, हे षडयंत्र रचण्यात आल्याचा संशय जनतेला येत आहे. खेमराज गडकरी यांनी माहिती कायद्यानुसार 2021 वर्षातील कामकाजासंदर्भात माहिती मागितली होती. पण यांचा घोटाळा जनतेसमोर येणार म्हणून अद्याप माहिती पुरवली गेली नाही. जो पर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तो पर्यंत जुन्या मेटना बदलू नका असा अर्ज देऊन देखील मेटना बदलण्याचा कट रचला गेला आहे.
संबंधित ग्रामपंचायत अधिकारी आणि सदस्यांनी आपली मनमानी चालूच ठेवली आहे. त्यामुळे येत्या सोमवारी खानापूर तालुका पंचायतीसमोर धरणे आंदोलन धरण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी ग्राम पंचायत आवारात नागरिकांनी एकच गोंधळ घातला. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार, असे घोटगाळी ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
Check Also
खानापूर येथे उद्यापासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा
Spread the love बेळगाव : तोपीनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणात …