मुंबई : पंढरपुरचा विठ्ठल हा संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी संप्रदाय आतूर झाला आहे. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसावर आली आहे. आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल न आकारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आषाढी वारीसाठी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पंढरपूरसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा आज आढावा घेतली. सर्व अधिकारी , पोलीस, पंढरपूर मंदिर समिती यांच्या सोबत आढावा घेतला आहे. यंदाच्या एकादशीचे अतिशय चांगले नियोजन केलेले आहे. कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडल्यामुळे यावर्षी वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे याचा विचार करून नियोजन केलेले आहे. व्हीआयपी व्यक्तीपेक्षा वारकरी महत्त्वाचे आहे, त्यांचे संरक्षण केले पाहिजे. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. एसटीने चार हजार बस सोडल्या आहेत. गरज पड्यास अधिक बस सोडण्यास एसटी महामंडळाला सांगितले आहे.
10 जुलैला आषाढी एकादशी
अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून असलेला आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करुन पालख्या 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहेत. तर 10 जुलैला आषाढी एकादशी आहे.
Belgaum Varta Belgaum Varta