
मुंबई : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास रायते येथील नवीन ब्रिजवर मुरबाडहून कल्याणकडे जाणारी ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात जोरदार टक्कर झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमींपैकी अनेकजण मुरबाड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील मृतांची नावे आता समोर आली आहेत.
आज सकाळी झालेल्या अपघाताची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलीस आणि टिटवाळा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून यात एकाच कुटुंबातील तीन मुलींचाही मृत्यू झाला आहे. तसेच महसूल विभागातील कर्मचारी देखील दुर्घटनेत ठार झाल्याचे समोकर आले आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना झाल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी केले आहे.
अपघातातील मृतांची नावे
प्रशांत चेदणे, भूषण घोरपडे, अनंता पवार, दीपक गवळी, नेहा मोहपे, मानसी मोहपे, प्रथमेश मोहपे, जिजागा केमबारी, गणपती मदे,
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या अपघाताबाबत निवेदन जारी करत म्हटले की, आज दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 10:45 वाजण्याच्या सुमारास कल्याण–मुरबाड–माळशेज महामार्गावर रायते गावाच्या हद्दीत, पांजरपोळ गोशाळेजवळील उल्हास नदीवरील नव्या पुलावर अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. कल्याणकडून प्रवासी घेऊन येणारी ओम्नी कार (क्र. MH-05 GA-0529) आणि अशोक लेलँड कंपनीचा मिक्सर (क्र. MH-12 TV-3660) यांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.
या अपघातात ओम्नी कारमधील 11 निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अतिशय वेदनादायी बातमी समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta