पणजी : राज्यात रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसावेळी भरसमुद्रात २४ पर्यटक असलेली बोट अडकली. बोटीवर पर्यटकांसह दोन कर्मचारी असा २६ जणांचा गट होता. याबाबत माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी धाव घेत त्यांचे जीव वाचवले. मुरगाव बंदरनजीक दोनतास हे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ चालले होते.
पणजीहून रविवारी सायंकाळी ‘नेरुल पॅराडाईज’ या टुरीस्ट फेरीबोटीतून २४ पर्यटक व २ बोटीवरील कर्मचारी जलसफारीसाठी निघाले होते. भर समुद्रात बोट पोहचली असतानाच अचानक ढग दाटून वादळी पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे बोट चालकांना समोरचे काहीच दिसत नव्हते. खळवलेल्या समुद्रात अडकल्याने सर्वांचा जीव टांगणीला लागला. त्याचवेळी समुद्रात गस्त घालणाऱ्या तटरक्षक दलाच्या ‘सी १४८’ या जहाजाला ही पर्यटकांची बोट दिसली व त्यातील जवांनानी बोटीच्या दिशेने जात बचावकार्य सुरू केले.
जीव वाचविल्याबद्दल मानले आभार
भर समुद्रात अडकलेल्या आपत्कालीन स्थितीतून सुखरुपरित्या बाहेर काढून त्यांचा जीव वाचवल्याबद्दल ‘नेरुल पॅराडाईज’ या पर्यटन फेरीबोटीच्या प्रवक्त्यांनी तटलक्षक दलाचे आभार मानले आहेत.