
इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या किमती वाढल्याचा परिणाम
निपाणी (वार्ता) : केंद्रीय अर्थसंकल्पात लिथियम बॅटरीचे दर कमी होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर सामान्य नागरिकांना स्मार्टफोन स्वस्त होण्याची आशा लागली होती. मात्र इतर आवश्यक इलेक्ट्रॉनिक साहित्यांच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्यांसाठी मोबाईलच्या किमती महागच असल्याचे येथील स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले. असाच निर्णय काही महिन्यांपूर्वी दिवाळीच्या सुमारास जीएसटी परिषदेनेही घेतला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्र उलट दिसून येत आहे. घोषणांचा परिणाम केव्हा होईल याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
सरकारने मोबाईल उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटरीवरील सीमा शुल्क कमी केले. यामुळे केवळ बॅटरीची किंमत काही प्रमाणात खाली आली. मात्र, मोबाइल बनवण्यासाठी लागणारे डिस्प्ले, मेमरी चिप्स आणि कॅमेरा मॉड्यूल्स यांच्या आयातीचा खर्च वाढला. परिणामी, एका बाजूला बॅटरी स्वस्त झाली असली तरी दुसऱ्या बाजूला इतर सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे मोबाईल कंपन्यांनी एकूण किमतीत कपात करण्यास नकार दिला आहे.
——————————————————————–
‘मागच्यावेळी अशीच घोषणा झाली होती. त्याचा परिणाम दर कमी करण्यासाठी झाला नाही. उलट अन्य साहित्याचे दर वाढल्याने मोबाइलच्या किमती कमी होण्याऐवजी वाढल्याचे चित्र होते. आताही तशीच परिस्थिती असून सध्या तरी दर कमी होईल असे चित्र नाहीच.’
– इम्रान मकानदार, मोबाईल, व्यवसायिक, निपाणी.
Belgaum Varta Belgaum Varta