
१५ दिवसांची दिली मुदत; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील सरकारमान्य टेक्सटाईल पार्क परिसरात सुरू असलेल्या पशु खाद्य व प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कारखान्यामुळे दुर्गंधी पसरत असून ग्रामस्थ व शेतकरी त्रस्त झाले आहेत.या कारखान्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. कारखान्यातून सतत येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे परिसरातील वातावरण दूषित झाले आहे. नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रार नागरिकांनी केली आहे. तात्काळ दुर्गंधी बांद न केल्यास केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या कारखान्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरत असून शेतात काम करणे कठीण बनली आहे. घराबाहेर राहण्याची अडचण निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांना डोकेदुखी, उलट्या, श्वसनाचे त्राससह इतर आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्र येत कारखान्याच्या ठिकाणी धडक देत मालकाकडे तीव्र शब्दांत जाब विचारला. शासनाने मंजूर केलेल्या टेक्सटाइल पार्कमध्ये अशा प्रकारचा प्रदूषणकारी कारखाना कसा सुरू झाला, असा सवाल उपस्थित करत तात्काळ कारखाना बंद करण्याची मागणी करण्यात आली.
ग्रामस्थांच्या एकजुटीसमोर कारखानदाराने नरमाईची भूमिका घेत पंधरा दिवसांच्या आत कारखाना बंद करण्याचे आश्वासन दिले. मात्र, हा निर्णय केवळ आश्वासनापुरता मर्यादित राहिल्यास ग्रामस्थांकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. याशिवाय संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कारखान्याची पाहणी करावी व पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्यास कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी बिरू हांडे, शांतिनाथ मोराळे, वैभव पुणेकर, अजित सवाडे, संजय सवाडे, महादेव सनदी, पप्पू भोरे, पिंटू हंडे, बाबासाहेब भोरे, पांडू पुणेकर, अशोक मोळे, सुशांत पुणेकर, काका चढेदार, सह परिसरातील शेतकरी, महिला, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta