शिक्षकांची गैरसोय, शिक्षण मंत्र्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षांनी कर्नाटकातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. सुटीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. त्यांची गुणवत्ता पुन्हा वाढविण्यासोबत सन २०२२-२३ सालातील शिक्षण शिकविण्यासाठी शिक्षक तयार असताना शिक्षण विभाग आणि सरकार यांच्यात मेळ नसल्याने पाठ्य पुस्तकातील होत असलेल्या निष्काळजीपणामुळे शिक्षकांच्या समस्या वाढल्या आहेत. त्यासाठी व्यवस्थित शाळा व्यवस्था सुरू करण्यासाठी सरकार ताबडतोब पाऊल उचलावे, अशी मागणी भोज जिल्हा पंचायत माजी सदस्य राजेंद्र वड्डर पवार यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
राजेंद्र वड्डर पवार पुढे म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून पाठ्य पुस्तकातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी सरकार गुंतले आहे. राज्यात शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, आणि विचारवंत असताना सरकार आणि शिक्षण खात्यात सामंजस्यपणा नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सोमवारी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्य पुस्तक मोठ्या दिमाखात देण्यात आले आहे. पण सदर पुस्तकातील कोणतेही अभ्यासक्रम शिक्षक शिकवू शकत नाहीत. कारण यापूर्वीही एकदा बदललेले आणि आता पुन्हा बदलून नव्याने पुस्तक छापण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकार दरबारी शिक्षण खात्याला किती महत्व आहे याचे प्रत्यक्ष उदाहरण सर्वांच्या समोर येत आहे.
सतत दोनवेळा पाठ्य पुस्तक बदलल्याने शिक्षण खात्यावर विनाकारण अतिरिक्त खर्च पडला असूनही अजून पाठ्य पुस्तकातील दुरुस्ती होताना दिसत नाही. २०२२-२३ सालातील इयत्ता तिसरीचे पुस्तक वगळून सर्व इयत्तेत प्रथम भाषा आणि ६, ८, ९ वीच्या इयत्तेतील द्वितीय भाषा कन्नड, ७, ८, ९ वीच्या इयत्तेतील तृतीय भाषा कन्नड आणि १० वीच्या इयत्तेतील समाज विज्ञान विषय बदलून सोमवारी मुलांच्या हातात पाठ्य पुस्तक पुरविण्यात आले आहे. पण पुस्तक पुरवठा करूनही शिक्षण विभागातर्फे पुस्तक पुन्हा बदलणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दिलेल्या पुस्तकातील कोणते धडे शिकवायचे आणि कोणते धडे सोडायचे याबाबतही सूचना आलेले नाही. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी पाठ्य पुस्तक घेऊन गप्प बसण्याशिवाय गत्यंतर नाही. नवीन पुस्तक आल्याशिवाय शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार नसून अजून कधी दुरुस्ती करून पुस्तक मिळणार की आणखीन काही सूचना देण्यात येणार याबाबत शिक्षक संभ्रमात आहेत. त्यासाठी शिक्षणमंत्री, सरकार, विचारवंत, साहित्यिक यांनी ताबडतोब निर्णय घेऊन शिक्षकांना सूचना करावे, अशी मागणी राजेंद्र वड्डर पवार यांनी निवेदनात केले आहे.
Check Also
सर्वसामान्यांनाही उज्ज्वला योजनेप्रमाणे सबसिडी द्या
Spread the love निपाणी : केंद्र शासनातर्फे उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना सबसिडीच्या दरात स्वयंपाक …