संकेश्वर (महंमद मोमीन) : संस्कार किराणा दुकानात विकत मिळत नाही. आई-वडीलांनी मुलांना बालपणात संस्कार द्यावे लागतात. मुलांना शिक्षणाबरोबर संस्कारसंपन्न घडविण्याचे कार्य पालकांनी करायला हवे असल्याचे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले.
ते निडसोसी महाशिवरात्री जात्रा महोत्सवात सहभागी होऊन बोलत होते. निडसोसी मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या हस्ते जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश कत्ती, संचालक प्रविण घाळी, गजानन क्वळी, हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रभुगौडा पाटील तसेच जिल्हा बॅंक व हिरण्यकेशी संचालक, पत्रकार अशोक चंदरगी, चिन्मय दीपा, प्रवचनकार श्रींचा, संकेश्वरातील पत्रकारांचा निडसोसी श्रींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
रमेश कत्ती पुढे म्हणाले, आजची युवापिढी संस्कार नसल्यामुळे भरकटलेली दिसत आहे.समाजाचा विनाश होतो आहे. हे जर टाळायचे असेल तर त्यावर संस्कार हाच एकमात्र उपाय आहे. मुले मोठी झाल्यानंतर त्यांना संस्कार देता येतील या भ्रमात राहू नका. कारण मुलांना बालपणातच संस्काराचे बाळकडू पाजवावे लागतात.
मोबाईल बंद करा
समाज बिघडविणेचे काम मोबाईल करीत आहे. त्यामुळे त्याचा वापर फक्त कामापुरता करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मोबाईलमुळे मुले बिघडत आहेत. तरी पालक मुलांच्या हातात मोठ्या किंमतीचे मोबाईल देऊन संसाराचे वाटोळे करुन घेत आहेत. समाज घातक वस्तू टाळण्याचे काम होण्याची गरज आहे.
हिजाब-केसरी वाद नको
कर्नाटकात हिजाब-केसरी वाद निर्माण झालेला दिसत आहे. त्यामुळे हिन्दू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण झाला आहे. आपला देश विविधतेत एकता दर्शविणारा आहे. भारतात सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने आजपावेतो नांदत आले आहेत. त्यामुळे हिजाब-केसरी वाद येथेच मिटवायला हवा आहे. शाळा-काॅलेजमध्ये मुला-मुलींनी ड्रेसकोडचा अंगीकार करायलाच हवा आहे. ड्रेसकोड हे समानतेचे प्रतिबिंब आहे. सर्व धर्माची शिकवण एकच राहिली आहे.आपला धर्म पाळा आणि इतर धर्माचा गौरव करा.
निडसोसी श्री म्हणाले, बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जनकल्याणाचे कार्य केले जात आहे. शेतकऱ्यांनी छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायिकांनी जिल्हा बॅंकेच्या विविध योजानांचा सदुपयोग करुन घेऊन आर्थिक समृद्धी साधायला हवी असल्याचे सांगितले.