संकेश्वर (महंमद मोमीन) : विद्यार्थ्यांना शिकविणे आम्ही धर्म समजून विद्यादानाचे कार्य केले. आज शिक्षणाचा बाजार मांडला गेल्याची खंत सेवानिवृत्त शिक्षक निजाम काशीम आवटे यांनी व्यक्त केली. संकेश्वर रुक्मिणी गार्डन येथे आयोजित १९८६-१९८७ दहावी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. प्रारंभी शिक्षिका सौ. शशीकला मोरे यांनी सरस्वती गीत सादर केले. प्रास्ताविक भाषण जयप्रकाश सावंत यांनी केले. शिक्षकांचा परिचय समीर सोलापूरे यांनी करुन दिला. यावेळी दिवंगत शिक्षक, शहीद जवानांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. सेवानिवृत शिक्षक लक्ष्मण किंवडा, निजाम आवटे, बसवराज करगुप्पी, शिक्षिका माधवी जेरे, पद्मावती गड्डी, नर्मदा मट्टीकल्ली, यशोदा जी. पाटील, गौरजान कलावंत, चंद्रभागा सावगांवकर, मंगल धडाम यांचे हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलनाने स्नेह मेळाव्याची शानदार सुरुवात करण्यात आली.
आवटे सर पुढे म्हणाले, आजकाल पालकांना आपली मुले इंग्रजी माध्यम शाळेतच शिकावी असे वाटू लागले आहे. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण नकोसे वाटू लागले आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतलेली मुले-मुली संस्कार संपन्न, सर्वच उच्च पदावर सेवा बजाविणारी, उद्योग-व्यवसायात प्रगती करणारी ठरली आहेत. इंग्रजी शाळेत शिकणारी मुले हुषार होतात. हा पालकांतील गैरसमज दूर होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.संकेश्वर सरकारी मराठी शाळेत पूर्वी २६ शिक्षकांचा स्टाफ होता. आज केवळ सहा शिक्षक सेवा बजावित आहेत. शाळेत मुलांची पटसंख्या देखील घटली आहे. ही गोष्ट पालकांनी गांभीर्याने घेणेची गरज आहे. पूर्वी शिक्षणाचा श्रीगणेशा नारळ आणि चिनमुरे वाटप करुन केला जायचा. आता लोवर केजी प्रवेशासाठी १८ हजार रुपये मोजावे लागत आहेत. पूर्वीच्या आणि आजच्या शिक्षणात जमीन आसमानाचा फरक आहे. आम्ही छडी लागे छमछम विद्या येई घम-घम यातून विद्यार्थी घडविण्याचे. त्यांना संस्कारसंपन्न बनविण्याचे कार्य केल्याचा सार्थ अभिमान वाटतो. आमचे विद्यार्थी आई-वडीलांचा, गुरुजनांचा आदर करणारे असल्याचे त्यांनी सांगितले. सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण किंवडा म्हणाले मुले शिकून शहाणी व्हावीत. यासाठी आंम्ही त्यांना चोप (मार) दिला त्यातून् आदर्श विद्यार्थी घडले. आजकाल शिक्षणातून विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण दिले जाते संस्कार दिले जात नाहीत. त्यामुळे आई-वडील गुरुजनांविषयी त्यांच्यात आदरभाव दिसेनासा झाल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षक बसवराज करगुप्पी म्हणाले, छडी लागे छमछम विद्या येई घम-घमचा जमाना मागे पडला आहे. आज विद्यार्थ्यांना शिक्षण देताना मारणे गुन्हा ठरला आहे. त्यामुळे आज शिक्षक मुलांना केवळ शिकविण्याचे कार्य करताहेत. त्यांना घडविण्याचे कार्य शिक्षकांनी सोडून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती मंगल रामचंद्र धडाम, नर्मदा आर. मट्टीकल्ली यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरव केला. यावेळी गुरुजनांच्या हस्ते माजी सैनिक जितेंद्र भोपळे, गुलाब नदाफ, सुनिल नगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयप्रकाश सावंत, पुरुषोत्तम पेंडसे, प्रभाकर मानमोडे, नेताजी मगदूम, समीर सोलापूरे, गुलाब नदाफ, पांडुरंग हरीहर यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी पप्पू पेंडसे, महेश चव्हाण, संजय पोवार, संजय जयकर, जितू भोपळे, आनंद मोरे, भाग्यश जोशी, अप्पा शिंत्रे, रमेश धुडूम, समीर सोलापूरे, राजू शेलार, राजू घाटगे, अच्युत पेंडसे, जयू सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार जितेंद्र भोपळे यांनी मानले.