
बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेसाठी दबाव वाढवत काँग्रेसचे २५ हून अधिक वरिष्ठ आमदार दिल्लीत दाखल झाले असून पक्षाच्या हायकमांडच्या भेटीसाठी ते प्रतीक्षा करत आहेत.
मंत्रिमंडळात फेरबदल करून वरिष्ठ आमदारांना मंत्रीपदाची संधी द्यावी, या मागणीसाठी हे आमदार काल दिल्लीला रवाना झाले. ते आज आणि उद्याही दिल्लीतच मुक्काम करून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे समजते.
मात्र, अद्यापपर्यंत या आमदारांना पक्षश्रेष्ठींची भेट मिळालेली नाही. आज संध्याकाळपर्यंत एआयसीसी अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
दरम्यान, राज्यातील काँग्रेस सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची पुनर्रचना करावी आणि वरिष्ठ आमदारांना संधी द्यावी, अशी मागणी सुमारे ४० हून अधिक आमदारांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनातही केली होती.
पोटनिवडणुकीची रणधुमाळी संपताच या आमदारांनी दिल्ली गाठून हायकमांडवर दबाव वाढवला आहे. या दबावाला पक्षश्रेष्ठी झुकतील का, की नेतृत्वबदलाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत मंत्रिमंडळ फेरबदल लांबणीवर टाकला जाईल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दिल्लीला गेलेल्या आमदारांमध्ये टी. बी. जयचंद्र, अशोक पट्टण, सी. पुट्टरंगशेट्टी, हंपनगौडा बदार्ली, बसवराज नीलण्ण शिवण्णनवर, ए. आर. कृष्णमूर्ती, यू. बी. बनकार, जी. एस. पाटील, एस. एन. सुब्बारेड्डी, डी. जी. शांतनगौडा, षडाक्षरी, एस. एन. नारायणस्वामी, लक्ष्मण सवदी, अप्पाजी नाडगौडा, प्रिया कृष्ण, रमेश बंडिसिद्धेगौडा, आणेकल शिवण्ण, नरेंद्रस्वामी, विनय कुलकर्णी, राघवेंद्र हेत्तनाळ, बेलूर गोपाळकृष्ण, यशवंत रायगौडा पाटील, जी. टी. पाटील आदींचा समावेश आहे.
Belgaum Varta Belgaum Varta