सरकार स्थापनेसाठी मगोपची मदत घेणार : मुख्यमंत्री
प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा प्रमोद सावंतांना विश्वास
पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, आज मी पंतप्रधान मोदींना भेटलो, निवडणूकीच्या निकालाबाबत चर्चा केली. ते पुढे म्हणाले, भाजप 20 हून अधिक जागा जिंकणार असल्याची मला खात्री आहे; आम्ही स्वतंत्र आणि प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करू; केंद्रीय नेतृत्व त्यांच्या मागण्यांबाबत त्यांच्याशी चर्चा करेल, आणि गरज पडल्यास एमजीपीचा पाठिंबा घेण्याची भुमिका त्यांनी स्पष्ट केली.दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत (आणि पंतप्रधान मोदी यांची निवडणुकीनंतरची ही पहिलीच भेट होती, नुकत्याच झालेल्या निवडणुका आणि एक्झिट पोलबद्दल दोघांच्यात सविस्तर चर्चा झाली. प्रमोद सावंत आणि पंतप्रधान मोदी यांची ही भेट राजकारणाला वेगळे वळण देवू शकते.
मुख्यमंत्री सावंत यांचा दावा
2012 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांनी साखळीत प्रचार केला होता. त्यावेळी आपण सात हजार मतांनी निवडून आलो होतो. त्याचप्रमाणे यावेळीही पाच हजार मताधिक्याने निवडून येणार, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यात कॉंग्रेसचे पारडे जड?
देशातील बहुसंख्य माध्यम समूहाने केलेल्या जनमत चाचण्यांच्या आधारे गोव्यात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या आघाडीला सर्वाधिक 16 ते 18 जागा मिळतील तर भाजपला 14 ते 16 जागा मिळतील असे भाकित वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे गोव्यात 2017 प्रमाणेच त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल असे अंदाज या चाचण्यांमधून पुढे येत आहे. यामुळे मगोप-तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि अपक्षांचे महत्त्व वाढणार असून ते सत्तेत महत्वाची भूमिका बजावणार असा अंदाज आहे.