बेळगाव : विद्यार्थ्यांनी दडपण न घेता मुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा‘ हा उपक्रम सुरु केला आहे. येत्या 1 एप्रिल रोजी होणाऱ्या या चर्चेत बेळगावच्या 2 विद्यार्थ्यांची निवड झाली हा अभिमानाचा विषय असल्याचे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता परीक्षा द्याव्यात यासाठी मोदींनी सुरु केलेला परीक्षा पे चर्चा हा उपक्रम जण आंदोलन व्हावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. येत्या 1 एप्रिलला होणाऱ्या या उपक्रमात पंतप्रधान मोदी जगभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या चर्चेत ऑनलाइनच्या माध्यमातून व्हर्च्युअल सहभाग घेणार आहेत.
संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, सृजनात्मक दृष्टिकोन ठेवून घेतलेल्या स्पर्धेतून या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड केली आहे. येत्या 1 एप्रिलला होणाऱ्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागासाठी जगभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मिळून 15.7 लाख जणांनी नावनोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांवर कोणत्याही दडपणाशिवाय परीक्षा व्हाव्यात याची खात्री करण्यासाठी परीक्षा पे चर्चा कार्यक्रम मोदी घेणार आहेत. जिल्हाधिकारी हिरेमठ पुढे म्हणाले, या कार्यक्रमासाठी संपूर्ण कर्नाटकातून 84 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात बेळगावच्या केंद्रीय विद्यालय क्र. 1 आणि 3 मधून अनुक्रमे श्रेयस मार्गनकोप्प आणि जान्हवी द्विवेदी यांचा समावेश आहे. व्हर्च्युअली ते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत या कार्यक्रमाच्या प्रश्नांची व्यवस्था केली आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.