खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने नागूर्डा येथे 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चाची पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली, यावेळी गावातील विठ्ठल रुक्माई मंदिरमध्ये बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्ष श्री. निरंजन सरदेसाई होते, बैठकीचा उद्देश स्पष्ट केल्यानंतर गावातील काही ज्येष्ठ मंडळींनी दैनंदिन जीवनामध्ये कशाप्रकारे सरकारी कार्यालयांमध्ये कन्नड भाषा सक्ती केल्यामुळे येणार्या अडचणींचा पाढा वाचला गावातील ज्येष्ठ पंच शंकर महाजन यांनी सातबारा उताऱ्यामधील तसेच इतर कागदपत्रांमधील नावांच्या अस्पष्ट उच्चारमुळे कशाप्रकारे तारांबळ उडते याची उदाहरणे सांगितली. मराठी भाषिकांच्या मूलभूत अधिकारावर प्रशासनाने गदा आणली आहे, या विरुद्ध आवाज उठवून अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढूया, असे सांगितले.
युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील बोलताना म्हणाले, अन्याय सहन करणे हा सुद्धा एक प्रकारचा अन्याय आहे. अन्यायाविरुद्ध लढून होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे हा आपला मूलभूत अधिकार आहे. मराठी भाषिकांनी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहूया, यावेळी माजी सभापती सुरेश देसाई यांनीसुद्धा मोर्चाबद्दल विचार व्यक्त करताना म्हणाले, समितीच्या आंदोलनाला उभारी देण्यासाठी नागूर्डा गावातील नागरिकांची कायम खंबीर साथ राहिलेले आहे. यावेळीसुद्धा अशाच प्रकारे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली.
समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनीसुद्धा गावातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले.
यावेळी श्री. गोपाळराव देसाई यांचा अध्यक्ष निवडीबद्दल शाल श्रीफळ देऊन गावच्या वतीने सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. निरंजन देसाई यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त करताना गावातील मराठी भाषिक सदैव समितीच्या पाठीशी खंबीरपणे सीमाप्रश्नाच्या लढाईमध्ये आहेत. ही लढाई लढत असताना आपले मौलिक अधिकार मिळवण्यासाठी सुद्धा कायम अग्रेसर राहून मरगळ झटकून या कार्यात असतील तसेच गावा बरोबर परिसरातील सुद्धा मराठी भाषिक या मोर्चाला उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वी करतील असे सांगून या मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला,
यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते गोपाळ पाटील, दत्तू कुट्रे, पांडुरंग सावंत, राजाराम देसाई, राजू पाटील, गावातील ज्येष्ठ पंच तानाजी पाटील, कृष्णा पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नागेश पारवाडकर, कृष्णा धुळ्याचे, रवळू वडगावकर, तानाजी चापगावकर, मनोज गावकर, विनायक पाटील, राजू ठोंबरे, विनोद खन्नुकर आदी मोठ्या प्रमाणात युवक व नागरिक उपस्थित होते.