Saturday , September 21 2024
Breaking News

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून निदर्शने

Spread the love

बेळगाव : स्मशानभूमीला जायला वाट नसल्याच्या निषेधार्थ सौंदत्ती तालुक्यातील एनगी ग्रामस्थांनी सोमवारी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून निदर्शने केली.
सौंदत्ती तालुक्यातील एनगी गावात हिंदू-मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही तालुका प्रशासनाने दाद दिली नव्हती. त्याच्या निषेधार्थ एनगी ग्रामस्थांनी बेळगावात आज आगळेवेगळे आंदोलन केले. गावातील ६५ वर्षीय अब्दुल खादर मिश्रीकोटी यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न रस्त्याअभावी निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांचा मृतदेह थेट बेळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून ठेवत ग्रामस्थांनी निदर्शने केली. ‘स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता न देणाऱ्या सरकारचा निषेध असो’ अशा घोषणा यावेळी निदर्शकांनी दिल्या. अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी निदर्शकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. यावेळी, एनगी गावात हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजाच्या स्मशानभूमीच्या जाण्यासाठी रस्ता नाही. रस्ता उपलब्ध करून देण्याची अनेकवेळा मागणी करूनही प्रशासनाने पावले उचलली नाहीत. त्यामुळे मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवून निदर्शने करत आहोत. प्रशासनाने यावर योग्य वर्ग काढला नाही तर येथेच थडगे उभारू असा इशारा निदर्शक ग्रामस्थांनी दिला.
याबाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन निदर्शकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. येत्या बुधवारी एनगी गावाला मी स्वतः भेट देऊन तुमची समस्या सोडवितो, प्रांताधिकारी, तहसीलदारांच्या उपस्थितीत अंत्यसंस्काराची व्यवस्था करतो, ज्या ६ शेतकऱ्यांच्या शेतातून स्मशानभूमीच्या जावे लागते त्यांच्याशी चर्चा करून रस्ता उपलब्ध करून देण्यात येईल. त्यांनी जमीन देण्यास नकार दिल्यास जमीन संपादन करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आश्वासनानंतर एनगी ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. त्याआधी मृतदेह ठेवून केलेल्या आंदोलनावरून पोलीस आणि निदर्शकांत शाब्दिक चकमकही घडली. एकंदर, विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना साधा स्मशानाचा रस्ताही करून देता येत नाही. त्यामुळेच ग्रामस्थांना मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवून निदर्शने करण्याची वेळ येते ही खेदाची बाब म्हणावी लागेल.

About Belgaum Varta

Check Also

ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रमाची आवश्यकता : वाय. पी. नाईक

Spread the love  बिजगर्णी…(बेळगाव) : विद्यार्थी दशेत आपल्याला कोण व्हायचे आहे ते निश्चित करणं गरजेचं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *