बेळगाव : १७ जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मादिनी हुतात्म्यांचे बलिदान आठवून स्वाभीमान जागवणे आवश्यक आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी हुतात्म्यांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. याचे स्मरण ठेवून कोणत्याही आमिषांना बळी न पडता मराठी माणसाने १७ जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा दिनी हुतात्म्यांना अभिवादन करावे, असे आवाहन अॅड. सुधीर चव्हाण यांनी केले.
कंग्राळी बुद्रूक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी हुतात्मा दिनाबाबत जागृती करण्यात आली. यावेळी बोलताना सुधीर चव्हाण म्हणाले, मराठी माणसांसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मंगळवारी मोठ्या संख्येने कंग्राळी खुर्द येथे होणार्या अभिवादन कार्यक्रमाला आणि जाहीर सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
मल्लाप्पा पाटील यांनी बोलताना, आमिषे दाखवून मराठी माणसांना फितवण्याचे काम काहींकडून होत आहे. अशी आमिषे धुडकावून स्वाभीमान जागवणे आवश्यक आहे. मराठी जनतेने हुतात्मा दिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
यावेळी राजकुमार पाटील, रमेश पाटील, अरूण पाटील, शंकर कोनेरी, शिवा कोळी, शंकर पाटील, संजय कोलते, किरण पाटील, अनंत पाटील, रवी चव्हाण, गोपाळ पाटील, व्यंकट पाटील, सदानंद चव्हाण, शुभम चौगुले, ओमकार पाटील, सोहन पाटील, योगेश पवार, शिरीष हुद्दार, संतोष पाटील, सुभाष चिखलकर आदी उपस्थित होते.