पुणे : पुणे जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरुच आहे. शेतमजुरीची काम करुन पारनेरला घराकडे निघालेल्या शेतमजुरांना पिकअप जीपने चिरडल्याची घटना घडली आहे. नगर कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे हा अपघात झाला आहे. या घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात दोन मुली, दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
सगळे शेतमजुर शेतीची सगळी कामं आटपून पारनेरला निघाले होते. त्यावेळी रात्रीच्या सुमारास अंधारात पिकअप जीपने एक दोन नाही तर आठ जणांना चिरडलं. या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. सगळ्या जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र याच उपचारादरम्यान चौघांना जीव गमवावा लागला. या अपघातात झालेल्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आपघाताची माहिती मिळताच पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णांना जवळच्या रुग्णालयात हलवलं. त्यानंतर त्यांनी अपघात स्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. गाडी चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गाडी चालकाची कसून चौकशी करण्यात येणार आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात काही प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शेतमजुरांचा नाहक जीव गेल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.