समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली जयंत पाटील यांची भेट
बेळगाव : सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी, यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील मंगळवारी (ता. २७) दिल्ली येथे वकिलांशी चर्चा करणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर येथे माजी मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत समितीच्या उमेदवारांना का पराभवाला सामोरे जावे लागले, याची सविस्तर माहिती दिली. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी यापुढे सर्वोच्च न्यायालयातील कामाला वेग यावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. समितीला पराभवाला सामोरे जावे लागले तरी मराठी भाषिक समितीच्या पाठीशी मोठ्या संख्येने असल्याचे निवडणुकीतून दिसून आले. त्यामुळे पुन्हा एकदा सीमालढा तीव्र करुन दाव्याला गती देण्यासाठी प्रयत्न करावेत, याच बरोबर वकिलांची चर्चा करावी, अशी मागणी केली.
यावेळी माजी मंत्री पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत समितीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने किमान दोन जागा निवडून येतील, असा विश्वास होता. मात्र निवडणुकीत जय पराभव होत असतात. त्यामुळे अपयश पाठीमागे सारून सीमाप्रश्नाची सोडवणूक वेळेत व्हावी, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, २६ जून रोजी दिल्ली येथे जाणार आहे. तसेच मंगळवारी सीमाप्रश्नी नेमणूक केलेल्या वकिलांची चर्चा करून त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या जातील, अशी माहिती दिली आहे.
यावेळी महादेव मंगनाकर, विनोद आंबेवाडीकर, पांडुरंग पट्टन, सुनील आंनदाचे, सतीश देसाई आदी उपस्थित होते.